अलवरच्या खेडलीतील वीरू हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी वीरूची पत्नी अनिता राज, तिचा बॉयफ्रेंड काशी प्रजापत आणि ब्रिजेश जाटव यांना अटक केली होती. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. वीरू आणि अनिताच्या १० वर्षांच्या मुलाने त्या रात्री नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.
मुलाने दिलेल्या माहितीनुसार, "रात्री पप्पा घरी आल्यावर त्यांनी फोन चार्ज करायला सांगितला. त्यानंतर मी त्यांचा फोन चार्ज करायला लावला आणि नंतर टीव्ही पाहू लागलो. पण आई अनिताने मला जबरदस्तीने झोपवलं. आई म्हणाली की, तू सकाळी उठत नाहीस. मात्र झोपलेलो असताना लोकांचा आवाज आणि बेडच्या आवाजामुळे मी अचानक जागा झालो. यानंतर मी पाहिलं की त्याने पप्पांचं तोंड उशीने दाबलं आणि मम्मी उभं राहून हे सर्व पाहत होती."
"उशीने तोंड दाबल्यानंतर, पप्पांचा गळाही दाबण्यात आला. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यानंतर त्याने पप्पांच्या मानेवर आणि चेहऱ्यावरही ठोसा मारला. गुन्हा केल्यानंतर तो तेथून निघून गेला." १० वर्षांच्या मुलाने दिलेल्या माहितीमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
मुलाने असंही सांगितलं की जेव्हा जेव्हा त्याचे वडील खेडलीमधून बाहेर जायचे तेव्हा त्याच्या आईचा बॉयफ्रेंड काशी घरी यायचा आणि घरीच राहायचा. मुलगा आता त्याच्या वडिलांना मिस करत आहे आणि तो पोलिसांना आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.