मुंबई - मे महिन्यात एकत्र येऊन हसण्या-खेळण्याचे, आठवणींना उजाळा देण्याचे स्वप्न पाहणारे डोकाडिया कुटुंब. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरात गप्पा व भविष्यातील योजनांवर चर्चा होत होती. अब्दुल कादर डोकाडिया, त्यांची पत्नी आणि त्यांच्या दोन लहान मुलींनी मिळून उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबीयांसोबत ‘गेट-टुगेदर’ करण्याचे स्वप्न रंगवले होते. कोण काय करणार, कुठे भेटायचं, कशी मजा करायची या सगळ्या गोष्टींचं नियोजन सुरू होते, मात्र त्यापूर्वीच नियतीने एका रात्रीत त्यांचे सगळं काही हिरावून घेतल्याचे डोकाडिया यांच्या भावाने पोलिसांना सांगितले.
पायधुनीतील घाटी मोहल्ल्यातील मोगल इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबीयांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून सर्व बाजूने तपास सुरू आहे. यामध्ये अब्दुल डोकाडिया (४०), त्यांची पत्नी नसरीन (३५), मोठी मुलगी आयेशा (१६) आणि धाकटी मुलगी जैनब (१३) यांचा मृत्यू झाला आहे.
डोकाडिया यांचा अंधेरीत मोबाइल एक्सेसरीचा व्यवसाय होता. डोकाडिया कुटुंब हे मूळचे गुजरातचे आहे. पाच भाऊ व दोन बहिणी असे त्यांचे कुटुंब आहे. उन्हाळी सुट्टीत सर्व भावंडांनी एकत्र येण्याचे ठरवले. मोठी बहीण आणि एका भावाची बायको अहमदाबादला गेली होती. त्या मुंबईत परतल्यानंतर डोकाडिया यांच्या घरी भेटीची तारीख ठरणार होती. त्यानुसार, डोकाडिया कुटुंबीयांनी प्लॅनिंग करण्यास सुरुवातही केली होती. मात्र, डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूच्या घटनेमुळे नातेवाईक अजूनही धक्क्यात आहेत. शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाल्यानंतरच तपासाला दिशा मिळेल. त्यानुसार, दोन ते तीन दिवसांत अंतिम अहवाल मिळण्याची शक्यता असून, त्यानुसार पाठपुरावा सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
मृत्यूचे गूढ कायम कुटुंबाचा मृत्यू विषबाधेमुळेच झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी पोलिस सर्व बाजू तपासून पाहत आहे. वैमनस्यातून विष घालून या कुटुंबाला ठार करण्यात आले की वैयक्तिक, व्यावसायिक अडचणींमुळे या दाम्पत्याने मुलींना ठार करत स्वतः आत्महत्या केली, या सर्व शक्यताही तपासून पाहिल्या जात आहे.
त्यांच्यावर कर्ज होते का? किंवा अन्य काही अडचणी होत्या का? याबाबत तपास सुरू आहे. त्यासाठी त्यांचे मोबाइलही फॉरेन्सिकसाठी पाठवले आहेत. अद्याप तरी मोबाइलमध्ये कुठलाही संशयास्पद संदेश आढळला नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
कलिंगड विक्रेतेही पोलिसांच्या रडारवर
घटनेच्या दिवशी दुपारी दोन वाजता अब्दुला यांनी नळबाजार फ्रुट मार्केटमधून कलिंगड खरेदी केला होता. हे त्याच्या मृत्यूपूर्वीच्या जबाबातून समोर आले होते. त्यानुसार, नळबाजारातील तीन ते चार कलिंगड विक्रेत्यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्यांच्यापैकी नेमके कुणाकडून कलिंगड खरेदी केले? तसेच कलिंगडामुळे आणखीन कुणाला काही त्रास झालेला आहे का? याचीही चौकशी सुरू आहे. मात्र अद्याप अन्य कुणाला त्रास झाल्याची माहिती अथवा तक्रार मिळालेली नाही.
Web Summary : Mumbai family's vacation plans turned tragic as all four members died mysteriously. Police investigate possible poisoning, questioning watermelon vendors. Financial troubles and family disputes are also being explored. The cause of death remains unclear, awaiting forensic reports.
Web Summary : मुंबई में परिवार की छुट्टियों की योजना दुखद रूप से बदल गई, चारों सदस्यों की रहस्यमय तरीके से मौत हो गई। पुलिस जहर की आशंका से जांच कर रही है, तरबूज विक्रेताओं से पूछताछ। वित्तीय परेशानी और पारिवारिक विवाद भी तलाशे जा रहे हैं। मौत का कारण अभी भी अज्ञात, फोरेंसिक रिपोर्ट का इंतजार।