जि.प. सत्तांतरासाठी भाजपाची व्यूहरचना
By Admin | Updated: May 21, 2014 00:13 IST2014-05-20T23:50:47+5:302014-05-21T00:13:11+5:30
संजय तिपाले , बीड लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपाच्या गोटात प्रचंड उत्साह संचारला आहे़

जि.प. सत्तांतरासाठी भाजपाची व्यूहरचना
संजय तिपाले , बीड लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपाच्या गोटात प्रचंड उत्साह संचारला आहे़ जिल्हा परिषदेतील सत्ता खेचून राष्ट्रवादीला दुसरा दणका देण्यासाठी भाजपाने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे़ सध्या भाजपाकडे हक्काचे २६ सदस्य आहेत़ सत्तांतरासाठी ३० हा जादूई आकडा गाठायचा असून भाजपाला केवळ चार सदस्यांच्या मदतीची आवश्यकता आहे़ जिल्हा परिषदेत एकेकाळी भाजपाने सत्तासूत्रे सांभाळलेली आहेत़ मात्र, मागील आठ वर्षांपासून भाजपाचे सदस्य विरोधी बाकावर आहेत़ जिल्हा परिषदेत भाजापाला गतवैभव आणून देण्याबाबत ज्येष्ठ नेते खा़ गोपीनाथ मुंडे यांनी देखील सूतोवाच केले आहे़ लोकसभा निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीचे पानिपत केले़ त्यामुळे राष्ट्रवादीला जबरदस्त हादरा बसला़ या धक्क्यातून राष्ट्रवादी पुरती सावरलीही नाही तोच आणखी एक दणका देण्यासाठी आता खुद्द गोपीनाथ मुंडे यांनीही जि़प़ मध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे़ जि़प़ मध्ये राष्ट्रवादीचे ३६ तर सेना- भाजपा- रासपा युतीचे २३ सदस्य आहेत़ संख्याबळ प्राप्त करण्यासाठी ३० सदस्यांची आवश्यकता आहे़ दरम्यान, लोकसभा निवडणुकीत आ़ विनायक मेटे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत महायुतीचा आश्रय घेतला़ त्यानंतर माजी आ़ भीमराव धोंडे, माजी आ़ साहेबराव दरेकर यांनीही राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपात प्रवेश केला़ या तिघांचेही प्रत्येकी एक सदस्य आहेत़ मेटे यांचे निकटवर्तीय राजेंद्र मस्के यांच्या पत्नी जयश्री मस्के, माजी आ़ धोंडे यांचे बंधू बापूराव धोंडे, माजी आ़ दरेकर यांचे पुत्र उद्धव दरेकर या तिघांचा समावेश आहे़ त्यामुळे युतीच्या सदस्यांचा आकडा आता २३ वरुन २६ वर पोहोचला आहे़ गेवराई तालुक्यातील एका सदस्याची भाजपाशी जवळीक लोकसभा निवडणुकीत गेवराई तालुक्यातील राष्ट्रवादीच्या एका सदस्याने पक्षांतर्गत विरोधकाचा जुना ‘हिशेब’ चुकता करण्यासाठी बंड पुकारुन भाजपा नेते गोपीनाथ मुंंडेंना मताधिक्य दिले़ते भाजपात आले तर सदस्य संख्या २७ वर पोहोचणार आहे़ आठ वर्षानंतर येईल भाजपाची सत्ता! राष्ट्रवादीतील छुप्या संघर्षाचा फायदा घेऊन भाजपा राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याची संधी सोडणार नाही़ त्यामुळे भाजपा ३० हा जादूई आकडा गाठण्यात यशस्वी होईल, असे संकेत आहेत़ तसे झाले तर तब्बल आठ वर्षांनंतर जिल्हा परिषदेचा ‘रिमोट’ पुन्हा एकदा ज्येष्ठ नेते तथा खा़ गोपीनाथ मुंडे यांच्याकडे जाईल़ विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तांतराची चिन्हे आहेत. काय म्हणतात जिल्हाध्यक्ष़़़ ? भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे म्हणाले, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उखडून फेकण्यासाठी भाजपा संपूर्ण ताकदीने कामाला लागली आहे़ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी भाजपाचे काम केले, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला़ मुंडेंकडील ‘जादूची कांडी’ जिल्हा परिषदेत लवकरच फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले़ केंद्रात भाजपाने सत्तांतर केले आता बीड जिल्हा परिषदेतही करण्यात येईल़ लवकरच खा़ मुंडे आढावा घेणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले़ या सदस्यांची नावे आघाडीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे़ खा़ गोपीनाथ मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीतच मदनराव चव्हाण यांना ‘लाल दिवा’ देण्याची घोषणा केलेली आहे़ खुद्द मुंडेंनीच त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने त्यांची निवड जवळपास निश्चित समजली जाते़ उपाध्यक्षपदासाठी उषा रमाकांत मुंडे, गयाबाई कराड, वृक्षराज निर्मळ, उद्धव दरेकर यांची नावे ‘रेस’मध्ये आहेत, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. सप्टेंबरमध्ये सत्तांतर? जिल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा अडीच वर्षांचा कार्यकाळ आॅगस्टमध्ये पूर्ण होतो़ त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींच्या निवडीची प्रकिया नव्याने पार पडेल़ यावेळी भाजपा राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा परिषदेची सत्ता खेचून घेईल, असे चित्र आहे़ मात्र, तत्पूर्वी राष्ट्रवादीतील नाराजांना गळाला लावून त्यांना आपल्या तंबूत खेचण्यासाठी भाजपाने ‘फिल्डींग’ लावण्यास सुरुवात केली आहे़