‘येळकोट...येळकोट...जयमल्हार’च्या जयघोषाने खंडोबा मंदिर दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 17:21 IST2018-12-13T17:04:18+5:302018-12-13T17:21:30+5:30
औरंगाबाद: चंपाषष्ठीनिमित्त सातारा येथील खंडोबा मंदिरात भाविकांनी येळकोट...येळकोट...जय मल्हार'चा जयघोष करत परिसर दणाणून सोडला. शहराच्या जवळ असलेल्या सातारा परिसरातील ...

‘येळकोट...येळकोट...जयमल्हार’च्या जयघोषाने खंडोबा मंदिर दणाणले
औरंगाबाद: चंपाषष्ठीनिमित्त सातारा येथील खंडोबा मंदिरात भाविकांनी येळकोट...येळकोट...जय मल्हार'चा जयघोष करत परिसर दणाणून सोडला.
शहराच्या जवळ असलेल्या सातारा परिसरातील खंडोबा मंदिरात आज पहाटे अभिषेक करण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,आ. सुभाष झांबड, महापौर नंदु घोडीले, माजी उपमहापौर राजू शिंदे, नगरसेविका सायली जमादार,ऋषीकेश खैरे,राजू नरवडे,सोलट तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत होते. या आधी बेल भंडारा, रेवडी उधळीत येळकोट...येळकोट...जय मल्हारचा जयघोष करीत, वाघ्या मुरळीचे नृत्य व डफ, तुनतुनंची सांगड घालत पालखी मिरवणूक काढण्यात आली.
अशी आहे अख्यायीका....
दीक्षीत बुवा हे मंदिरातील पुजा करीत असत, त्यांच्या वार्धक्यामुळे ते गडावर जाणं शक्य नसल्याने अखेर खंडोबा यांनी भक्ताखातर स्वत:च गडाहुन खाली उतरून आले. तेव्हा पासून ही परंपरा आजही कायम आहे. दरवर्षी चंपाषष्ठीला पालखी मिरवणूकीने खंडोबा मुर्ती अभिषेकासाठी दर्शन देण्यासाठी नेली जाते. असे मंदिराचे अध्यक्ष साहेबराव पळसकर, गंगाधर पारखे यांनी सांगितले.
वांग्याचे भरीत व बाजरीची भाकरीचा नैवेद्य
खंडोबा यात्रा उत्सवाला गुरूवारपासून सुरूवात झाली असून मंदिर परिसरात वाग्याचे भरीत व बाजरीचा एकत्र नैवेद्य देण्यात येतो. चंपाषष्ठीलाच नव्याने वांगे येतात, चंपाषष्ठीला वांग्याचे पदार्थ खाण्यास सुरूवात करण्यात येते, असे पुजारी दिलीप धुमाळ म्हणाले.