एसटी महामंडळाच्या कामगारांची निदर्शने
By Admin | Updated: May 28, 2014 00:26 IST2014-05-28T00:02:18+5:302014-05-28T00:26:16+5:30
उस्मानाबाद : एस.टी.कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने २७ मे रोजी सुटीच्या वेळेत विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

एसटी महामंडळाच्या कामगारांची निदर्शने
उस्मानाबाद : एस.टी.कामगारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने २७ मे रोजी सुटीच्या वेळेत विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. वेतन करार २०१२ -२०१६ मधील रुपये १ हजार ५०० कोटी थकबाकीची रक्कम कामगारांना देण्यात यावी, १० टक्के वाढीव महागाई भत्ता देण्यात यावा. कायदे, करार आणि परिपत्रकाचा भंग करुन देण्यात आलेल्या शिक्षा रद्द कराव्यात. एस.टी. चे उत्पन्न वाढविण्यासाठी संघटनेने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. वेतन करार मान्य करुनही अंमलबजावणी न झालेल्या बाबींची पूर्तता करावी. शासनाकडून देय असलेली १ हजार ८४० कोटीची रक्कम रा.प. महामंडळास रोखीने देण्यात यावी. अन्य राज्याप्रमाणे प्रवासी कर व वाहन करात सवलत देण्यात यावी, पथकरात सूट द्यावी, इतर राज्याप्रमाणे एस.टी. ला सक्षम करण्यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य देण्यात यावे. या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते. वारंवार पाठपुरावा करुनही शासन मागण्या गांभिर्याने घेत नाही, असे आंदोलनकर्त्यांचे मत आहे. आंदोलनानंतर विभागीय नियंत्रकांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये स्थानिक पातळीवरील मागण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. आंदोलनामध्ये विभागीय अध्यक्ष अग्निवेश शिंदे, विभागीय सचिव शरद राऊत यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. यानंतरही मागण्यांचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी) स्थानिक मागण्या २००९ मध्ये सेवेत रुजू झालेल्या यांत्रिकी व वाहक कर्मचार्यांच्या करारानंतरची वेतन निश्चिती चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. ती दुरुस्त करण्यात यावी. विना तक्रार १० वर्षे सेवा झालेल्या वाहक कर्मचार्यांस रा.प. परिपत्रकाप्रमाणे एक वेतनवाढ देण्यात यावी. आंतर प्रादेशिक बदल्या झालेल्या सर्व प्रवर्गातील कर्मचार्यांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करावे. ईटीआयएम मशीन अचानक बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या दृष्टीने कारवाई करावी. आगारातील यांत्रिकी कर्मचार्यांना काम करण्यासाठी लागणारी आवश्यक अवजारे, साहित्य तातडीने पुरवठा करण्यात यावे. महिला कर्मचार्यांना विश्रांतीपूर्व सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात.