पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा
By Admin | Updated: December 17, 2014 00:00 IST2014-12-16T23:39:10+5:302014-12-17T00:00:49+5:30
गंगापूर : शहरवासियांना भयमुक्त करावे, या मागणीसाठी शहरातील महिला व शालेय विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा नेला. त्यांनी पोलीस निरीक्षक विजयकुमार सोनवणे यांना निवेदन दिले.

पोलीस ठाण्यावर महिलांचा मोर्चा
गंगापूर : गंगापूर शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या हल्ल्यातील आरोपीस कठोर शासन व्हावे, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखून शहरवासियांना भयमुक्त करावे, या मागणीसाठी शहरातील महिला व शालेय विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा नेला. त्यांनी पोलीस निरीक्षक विजयकुमार सोनवणे यांना निवेदन दिले.
हा मोर्चा प्रगती कॉलनीपासून सुरू झाला. शिवाजी चौक, आंबेडकर चौकमार्गे मोर्चा पोलीस ठाण्यावर नेण्यात आला. मोर्चा पुढे जात असताना महिला यात सहभागी होत गेल्या. १२ डिसेंबर रोजी गंगापूर शहरातील गोदावरी कॉलनीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर भरदुपारी १ वाजेदरम्यान अंबेवाडी येथील बाळू जगन्नाथ आळंजकर याने सदर तरुणीच्या घरात वाईट हेतूने प्रवेश केला. तरुणीने त्यास विरोध केला असता त्याने आपल्याजवळ असलेल्या तीक्ष्ण हत्याराने तरुणीच्या अंगावर वार करून जखमी केले. नराधम तरुण एवढ्यावरच न थांबता दगडानेही तरुणीच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले.
या घटनेमुळे शहरात दहशत निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे शहरातील महाविद्यालयीन व शाळकरी मुली-महिला धास्तावल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी बाळू आळंजकर याला अटक करून न्यायालयात उभे केले असता त्यास १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
सदर घटनेचे पडसाद शहर व परिसरात उमटले. हा मोर्चा नगरसेविका सुवर्णा जाधव, बिजला साबणे, मंदाबाई खाजेकर, आशाबी मन्सुरी यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. गंगापूर शहरातील महिला, तरुणींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यात सरिता सुंब, डॉ. वर्षा गायकवाड, अंजली राजपूत, सविता चोरमारे, शोभा गवारे, सविता वाघचौरे, मंजिरी भाले, पूजा रहाटवाड यांच्यासह धूत कन्या प्रशाला, श्री मुक्तानंद महाविद्यालयामधील विद्यार्थिनींनी सहभाग होता.