वादळी वारे अन् गारपिटीचा तडाखा
By Admin | Updated: May 22, 2014 00:13 IST2014-05-21T23:48:17+5:302014-05-22T00:13:31+5:30
उमरगा : वादळी वार्यासह झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे तालुक्यातील हंद्राळ, कदमापूर, दुधनाळ या गावांतील शेकडो घरावरील पत्रे उडून गेले आहेत

वादळी वारे अन् गारपिटीचा तडाखा
उमरगा : वादळी वार्यासह झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे तालुक्यातील हंद्राळ, कदमापूर, दुधनाळ या गावांतील शेकडो घरावरील पत्रे उडून गेले आहेत. तसेच विद्युत खांबही कोसळले. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. गारांचा मार लागल्यामुळे तीन जण जखमी झाले. तसेच पत्रे लागून जनावरेही जखमी झाले आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दुधनाळ, कदमापूर, हंद्राळ, कुन्हाळी या गावांमध्ये वादळी वार्यासह पाऊस झाला. क्षणार्धातच अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. त्यामुळे या भागातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. हंद्राळ हे सुमारे एक हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील जवळपास अडीचशे घरावरील पत्रे उडून गेले. त्यामुळे पावसाचे पाणी घरात जाऊन धान्यासह संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाराही भिजल्यामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे पशुपालकांनी सांगितले. दरम्यान, हंद्राळ परिसरात गारपीटही झाली. गारांचा मार लागून येथील मुकींद बोयणे, रघुनाथ सुरवसे, पंढरीनाथ हत्तरगे हे तिघेजण जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे शिवाजी व्यंकट कुंभार, बंडाप्पा मलकाप्पा बिराजदार, दत्तात्रय लिंबाजी हत्तरगे यांची जनावरे जखमी झाली आहेत. सदरील घटनेचा पंचनामा तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी विजय पाटील, तलाठी शिवराज पाटील, ग्रामसेवक गोपाळ घंटे, कृषी सहाय्यक सचिन सरपे यांनी बुधवारी दिवसभर नुकसानीचे पंचनामे केले. (वार्ताहर) दीडशे झाडे उन्मळून पडली वादळी वार्यामुळे तिन्ही गावांतील मिळून सुमारे दीडशे झाडे उन्मळून पडली आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणचे विद्युतखांबही जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे सदरील गावांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासोबतच दळण-कांडपाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेकडो संसार उघड्यावर वादळी वार्यामुळे उडून गेलेल्या पत्र्यांची बुधवारी दिवसभर ग्रामस्थ दिवसभर जमवाजमव करताना दिसून येत होते. उडून गेलेल्यापैकी अर्धेही पत्रे हाती लागले नसल्याचे हंद्राळचे सरपंच रमेश हत्तरगे यांनी सांगितले. रात्री उशिरा झालेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. जिवाच्या भीतीने गावातील ग्रामस्थ भयभीत झाले होते. या भीतीपोटी ग्रामस्थांनी रात्र जागून काढली.मंगळवारी रात्री गारपीट झाली होती. त्यामुळे सर्वत्र गाराच गारा साचल्या होत्या. सदरील गारांचे ढीग बुधवारी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत दिसून येत होते. कालांतराने उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर गारा वितळल्या, असे ग्रामस्थांनी सांगितले.