२८ हजार ग्रामपंचायतींना विकासाचे मॉडेल बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : समृद्ध पंचायतराज अभियान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 10:17 IST2025-09-18T10:16:27+5:302025-09-18T10:17:09+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून फुलंब्री येथील देवगिरी साखर कारखाना परिसरात बुधवारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या राज्यस्तरीय कार्यक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

२८ हजार ग्रामपंचायतींना विकासाचे मॉडेल बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : समृद्ध पंचायतराज अभियान
फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) : ग्रामविकासाच्या योजनांमध्ये कोणतेही गाव मागे राहू नये, यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानातून राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती व ४० हजार गावे मॉडेल म्हणून विकसित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून फुलंब्री येथील देवगिरी साखर कारखाना परिसरात बुधवारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या राज्यस्तरीय कार्यक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
२५० कोटींची पारितोषिके देणारी पहिलीच योजना
मुख्यमंत्री म्हणाले, १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या अभियानातील स्पर्धेत यशस्वी ग्रामपंचायतींना तब्बल २५० कोटींची पारितोषिके दिली जाणार आहेत.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना तालुकास्तरावर प्रथम १५ लाख, द्वितीय १२ लाख आणि तृतीय ८ लाख, जिल्हास्तरावर प्रथम ५० लाख, द्वितीय ३० लाख आणि तृतीय २० लाख तर राज्यस्तरावर प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी आणि तृतीय २ कोटींची बक्षिसे देण्यात येतील, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी दिले.
बहिणींना बिनव्याजी कर्ज
आमच्या लाडक्या बहिणींना केवळ १५०० रुपयांवर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी प्रत्येक गावात त्यांची एक पतसंस्था सुरू करून त्यांना १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. उद्योग व्यवसायासाठी अर्थसाहाय्य देऊन सक्षम करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.