आलेले पाणी मुरतय कोठे..?
By Admin | Updated: April 19, 2016 01:19 IST2016-04-19T01:03:51+5:302016-04-19T01:19:23+5:30
लातूर शहरात एकूण ३५ प्रभाग आहेत़ प्रत्येक प्रभागाला २ टँकरने मनपा ८ दिवसाआड पाणी देते़ तर स्थानिक स्त्रोतातून तसेच रेल्वेचे आलेले पाणी उचलण्यासाठी

आलेले पाणी मुरतय कोठे..?
लातूर शहरात एकूण ३५ प्रभाग आहेत़ प्रत्येक प्रभागाला २ टँकरने मनपा ८ दिवसाआड पाणी देते़ तर स्थानिक स्त्रोतातून तसेच रेल्वेचे आलेले पाणी उचलण्यासाठी २० हजार व १२ हजार लिटर क्षमतेचे ६० टँकर आहेत़ ६ हजार लिटर क्षमतेच्या ७० टँकरने पाणी पुरवठा केला जातोे़ निम्न तेरणा, डोंगरगाव, साई-नागझरी, बॅरेजेसमधून दिवसाला किमान ४० लाख लिटर आणि रेल्वेचे ५ लाख लिटर असे ४५ लाख लिटर पाणी संकलित होते़ टँकरने ८ दिवसाला पाणीपुरवठा करण्यासाठी लातूर शहराला ४० लाख लिटर पाण्याची दिवसाला गरज आहे़ यापेक्षा अधिक पाणी संकलित होते़ परंतू वितरण व्यवस्थेत दोष आहेत़ त्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही़ परिणामी कुठल्या प्रभागात १२ दिवसाला तर कोठे १५ दिवसाला पाणी मिळते़ यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत़ मोठ्या प्रमाणात पाणी उचलूनही आम्हाला पाणी का मिळत नाही असा प्रश्न ‘लोकमत’ ने केलेल्या सर्व्हे दरम्यान नागरिकांनी उपस्थित केला़ शहरातील प्रभाग २, ३, ४, ५, ६, ८, ९, १३, १६, २१, २८, ३१, ३२, ३३ आदी प्रभागात ‘लोकमत’ चमुने नागरिकांची मते जाणून घेतली असता टँकर कधी येते तर कधी नाही़ कुठे बारा दिवसातून २०० लिटर पाणीमिळते तर कुठे ते ही दिले जात नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या़ २०० लिटर का असेना किमान ५ दिवसाला पाणी मिळावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. पाणी वाढल्यावरही ३५ प्रभागाला ७० टँकर कसे पुरतात ? आता टँकर वाढवून प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळेल, अशी व्यवस्था का नाही? असा सूर नागरिकांमधून आहे. पण मनपा लक्ष देईल काय ?
दररोज ३५ लाख लिटर पाणी शहरात येत आहे. परंतु, नागरिकांना केवळ २५ लाख लिटर पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे प्रति कुटुंब दहा ते बारा दिवसाला २०० लिटर पाणी दिले जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही वाटपाच्या महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पाणी प्रमाणापेक्षा कमी उपलब्ध होत आहे.
४महसूल मंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे शहराला रेल्वेद्वारे ५० लाख लिटर व निम्न तेरणेतून ५० लाख लिटर पाणी दररोज उपलब्ध झाल्यास शहराला नळाने पाणी देणे शक्य आहे. महापालिकेने नळाने पाणी देण्याचे नियोजन करावे. जेणेकरून उपलब्ध पाणी समान वाटप होईल. नागरिकांचा संताप कमी होण्यास मदत होईल, असे नगरसेवक शैलेश स्वामी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
ज्या नगरात पाणी वाटप केले जात आहे, त्याची नोंद मनपा कार्यालयात केली जाते. शिवाय, ज्या नगरात पाणीपुरवठा केला आहे, तेथील चार लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. नियमानुसार सर्वांनाच २०० लिटर पाणी दिले जात आहे. तक्रार असल्यास त्याची चौकशीही केली जाते. अधिकचे पाणी देण्याची मागणी आहे. त्यावर मात्र निर्णय नसल्याचे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग म्हणाले.