विवाह सोहळ्याची जय्यत तयारी

By Admin | Updated: April 16, 2016 01:39 IST2016-04-16T01:24:09+5:302016-04-16T01:39:13+5:30

जालना : बाजार समिती संकुल परिसरात बळीराजा नगरीमध्ये रविवारी होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी एकूण २४ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत

Wedding preparations for the wedding ceremony | विवाह सोहळ्याची जय्यत तयारी

विवाह सोहळ्याची जय्यत तयारी


जालना : बाजार समिती संकुल परिसरात बळीराजा नगरीमध्ये रविवारी होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी एकूण २४ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या सर्व समिती प्रमुखांची बैठक घेत भाजपा कार्यालयात प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी आढावा घेतला.
खा. दानवे यांनी प्रत्येक समिती प्रमुख आणि सदस्यांकडून दिलेल्या कामाचा आढावा घेतला. केवळ नेत्यामागे फिरण्यासाठी जबाबदारी घेऊ नका. घरचेच कार्य आहे, असे समजून प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे. कामात हलगर्जीपणा न करता दिलेले काम अधिक चांगल्या पद्धतीने कसे पार पाडता येईल, यावर लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना खा. दानवे यांनी बैठकीत दिल्या.
सामूहिक विवाह सोहळा हे पक्ष कार्य समजून प्रत्येक कार्यकर्त्याने या कार्यात स्वत:ला झोकून द्यावे, असे सांगून खा. दानवे म्हणाले, आपण स्वत: झेंडे लावण्याबरोबरच इतर बारीकसारीक कामे केल्यानेच या पदापर्यंत पोहोचू शकलो.
बैठकीस स्वागताध्यक्ष आ. नरेंद्र पवार, आ. नारायण कुचे, भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, भाऊराव देशमुख, एकनाथ जाधव, रेखा कुलकर्णी, देविदास देशमुख, सिद्धिविनायक मुळे, अर्जुन गेही, किशोर अग्रवाल, बद्रीनाथ पठाडे, भास्कर दानवे, कमल तुल्ले, वंदनाताई कुलकर्णी, सखूबाई पनबिसरे, जिजाबाई जाधव, विजया बोरा, अरूणा जाधव, स्वाती जाधव, गणेश नरवडे, संजय राऊत, सतीश जाधव, शिवराज जाधव, विरेंद्र धोका, रोषण चौधरी, गुलाब पनबिसरे उपस्थित होते.
शिव स्मारक समितीच्यावतीने आयोजित या सामुहिक विवाह सोहळ्यात मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यातून जोडप्यांची नोंदणी झालेली आहे. दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाई या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे उपाय योजना केल्या जात आहेत. असे असले तरी सामाजिक बांधिलकी म्हणून पक्षाच्यावतीने मदत करण्याच्या उद्देशाने जालना शहरात सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे खा.दानवे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
या सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह मंत्रीमंडळातील अनेक मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार असल्याने समारंभ स्थळ उभारणीचे काम सुरक्षिततेच्या दृष्टिने केले जात आहे.
दरम्यान, भोकरदन तालुक्यातील ५०० स्वयंसेवक यांनी खा. रावसाहेब दानवे यांची विवाहस्थळी भेट घेऊन या सोहळ्यात स्वयंस्फूर्तीने सेवा देण्याची तयारी दर्शविली. खा. दानवे यांनी त्यांचा उत्साह पाहून त्यांना स्वतंत्र व्यवस्थेसाठी जबाबदारी दिली. सामूहिक विवाह सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी एकूण २४ समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. यात स्वागत समिती, व्यासपीठ व्यवस्था व समन्वय समिती, पाणी वाटप, भोजन व्यवस्था, स्वयंपाकगृह समिती, प्रचार प्रसिद्धी, वाहनतळ पार्कींग, मंडप, लाऊडस्पीकर, लाईटींग व्यवस्था, वीज पुरवठा, मैदान स्वच्छता, वरात व्यवस्था, वैद्यकीय व रक्तदान शिबीर व्यवस्था, धार्मिक विधी, शासकीय पत्रव्यवहार, अक्षदा वाटप, हार वाटप समिती, वधू वरांचे भोजन समिती, वर मेकअप समिती, वधू मेकअप समिती, भांडी वाटप, मंगळसूत्र वाटप, व्हिडीओ शुटींग, फायर ब्रिगेड, झेंडे आणि होर्डीग्ज व्यवस्था समित्यांचा समावेश आहे.
रविवारी होणाऱ्या सामुहिक विवाह सोहळ्याप्रसंगी २० टँकरर्सद्वारे बळीराजा नगरीमध्ये पाणी पुरवठा केला जाणार आहे. येथे पाईपची व्यवस्था केली जाणार असून या पाईपला ४०० तोट्या बसविण्यात येणार आहे. पाण्याचा अपव्यय न होता सर्वांना पाणी पुरवठा व्यवस्थित केला जाईल याची दक्षता घेतली जाणार आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील जोडप्यांची नोंदणी झाली असून, सर्व धर्मिय वधू वरांचा यात समावेश आहे. त्या त्या धर्माच्या चाली, रितीनुसार हा विवाह सोहळा होणार आहे. सोहळ्यात १ लाख लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे.
५५० वधू वरांची रिक्षांतून जालना शहरात वरात काढण्यात येणार आहे. बळीराजा नगरी, कन्हैय्या नगर, बडी सडक, शिवाजी पुतळा, काद्राबाद पाणीवेस, मामा चौक, भाजपा कार्यालय आणि बळीराजा नगरी अशी ही वरात काढण्यात येणार आहे.

Web Title: Wedding preparations for the wedding ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.