मानवतेला साह्यभूत संशोधन करीन
By Admin | Updated: May 21, 2014 01:12 IST2014-05-21T01:06:24+5:302014-05-21T01:12:21+5:30
औरंगाबाद : आई, बाबा डॉक्टर आहेत; परंतु मला त्यात रस नाही. माझा आदर्श एपीजे अब्दुल कलाम असून मला शास्त्रज्ञ व्हायचंय. मानवतेला साह्णभूत ठरणारं संशोधन करायचंय, असे यश सांगत होता.

मानवतेला साह्यभूत संशोधन करीन
औरंगाबाद : आई, बाबा डॉक्टर आहेत; परंतु मला त्यात रस नाही. माझा आदर्श एपीजे अब्दुल कलाम असून मला शास्त्रज्ञ व्हायचंय. मानवतेला साह्णभूत ठरणारं संशोधन करायचंय, असे यश सांगत होता. सीबीएसई बोर्डाने मार्च २०१४ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत रिव्हरडेल हायस्कूलचा विद्यार्थी यश कुलकर्णी याने ९९.२ टक्के गुण प्राप्त केले असून, तो देशात प्रथम आल्याचे शाळेचे अध्यक्ष राघवेंद्र जोशी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत घोषित केले. यावेळी त्याची आई डॉ. अपर्णा सोबत होत्या. यश म्हणाला की, मला माणसांसाठी काहीतरी वेगळे करायचे आहे. शास्त्रज्ञ होण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे पुढचा अभ्यासही मी बेसिक सायन्सचाच करणार आहे. मला डॉक्टर, इंजिनिअर होण्याची इच्छा नाही. तया यशात शाळा व आई-बाबांचा मोठा वाटा असल्याचे सांगून तो म्हणाला की, सकाळी ५ वाजता उठून मी अभ्यास करायचो. माझ्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, यासाठी एनसीईआरटीची पाठ्यपुस्तके मी अगोदर वाचून काढायचो, नंतर गाईडचा वापर व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करायचो. शाळेव्यतिरिक्त दररोज ५ ते ६ तास अभ्यास करायचो. यासह इतर वाचनाचाही मला छंद आहे. काही पुस्तके मी वाचून काढली आहेत. संगीत ऐकण्याचाही मला छंद आहे. यशचे वडील नेव्हीत डॉक्टर असून मागील दीड वर्षापासून ते आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर मेडिकल आॅफिसर म्हणून कार्यरत आहेत. वडिलांपासून प्रेरणा घेऊनच त्याने शास्त्रज्ञ होण्याचे निश्चित केले आहे. डॉ. अपर्णा म्हणाल्या की, यश स्वत:चा अभ्यास करून घेत होता. त्याला सातत्याने ‘अभ्यास कर’ असे म्हणण्याची गरज पडली नाही. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दूरध्वनीवरून यश कुलकर्णी याचे आणि त्याच्या कुटुंबियाचे अभिनंदन व कौतुक केले. दहावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत अव्वल येऊन यशने औरंगाबादची पताका देशात फडकावल्याबद्दल राजेंद्र दर्डा यांनी गौरवोद्गार काढले. यशने केलेले परिश्रम, घेतलेल्या कष्टाची माहितीही त्यांनी घेतली. श्री साई एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष राघवेंद्र जोशी, सदस्य सी. पी. त्रिपाठी यांचेही राजेंद्र दर्डा यांनी अभिनंदन केले. राघवेंद्र जोशी म्हणाले की, इयत्ता दहावीच्या निकालात सतत पाचव्या वर्षी शाळेने यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. यश कुलकर्णी याने देशात प्रथम येताना आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढल्याचा दावा त्यांनी केला. यशने गणित, विज्ञान आणि संस्कृत या विषयांत १०० टक्के, इंग्रजीत ९९ आणि सामाजिक विज्ञानात ९७ गुण पटकावले आहेत.