आम्ही नव्हे, आई-बाबाच गुंतलेत सोशल मीडियात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:08 IST2017-11-14T00:08:44+5:302017-11-14T00:08:55+5:30
ड्रॅगनसोबत युद्ध करावे की नाही येथपासून ते बीड शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता येथपर्यंत साधकबाधक चर्चा करीत बालमित्रांनी त्यांचे ‘व्हिजन’ ‘लोकमत’समोर मांडले

आम्ही नव्हे, आई-बाबाच गुंतलेत सोशल मीडियात!
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : ड्रॅगनसोबत युद्ध करावे की नाही येथपासून ते बीड शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता येथपर्यंत साधकबाधक चर्चा करीत बालमित्रांनी त्यांचे ‘व्हिजन’ ‘लोकमत’समोर मांडले. शाळेपासून घरापर्यंत आम्हाला कुठलेही टेन्शन नसते; मात्र आमच्याकडे कुणी तरी लक्ष दिले पाहिजे. आम्ही नव्हे, तर आई-बाबाच सोशल मीडियात गुंतले आहेत. म्हणून त्यांना आमच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, अशी विदारकताही रविवारी ‘लोकमत’च्या चर्चासत्रात बालमित्रांनी स्पष्टपणे मांडली. १४ नोव्हेंबर, बालदिनाचे औचित्य साधून चर्चासत्राच्या माध्यमातून ‘लोकमत’ने व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. त्यावेळी बच्चे कंपनीने मनमोकळेपणे आपली परखड मते व्यक्त केली.
स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण पैसा, मानसन्मान मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. याचा साहजिकच त्यांच्यावर तणाव येतो. या सर्व धकाधकीच्या जीवनात पालकांचे आपल्या चिमुकल्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांची घुसमट होत असल्याचे समोर आले आहे. जागतिक बालदिनानिमित्ताने तज्ज्ञांशी संवाद साधल्यानंतर हे कटुसत्य उघड झाले.
घरात, अंगणात बाळ असले की घर फुलून निघते, घरात आनंदाचे वातावरण असते. प्रत्येक जण खुश असतो; परंतु ते थोडे मोठे झाले की, पूर्वी जीव लावणाºया पालकांचे त्याच्याकडे नकळत दुर्लक्ष होत जाते. पालक आणि मुलांचा संवाद दुरावल्यामुळे त्यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते करपू लागते. त्यामुळे चिमुकली मुले एकटे पडतात. ज्या वयात त्यांना पालकांकडून सहवासासह खेळण्याच्या, खाण्याच्या अपेक्षा असतात, त्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे त्यांचा स्वभाव एकलकोंडा होतो.