कोकीळा नामशेष होण्याच्या मार्गावर; पक्षीप्रेमींमध्ये चिंता
By Admin | Updated: June 8, 2014 00:54 IST2014-06-08T00:47:22+5:302014-06-08T00:54:19+5:30
नांदेड : कोकिळेचा सुमधुर व मन प्रसन्न करणारा आवाज सर्वांना भुरळ घालत असतो़ उन्हाळ्यात सकाळी कानावर पडणारा हा

कोकीळा नामशेष होण्याच्या मार्गावर; पक्षीप्रेमींमध्ये चिंता
नांदेड : कोकिळेचा सुमधुर व मन प्रसन्न करणारा आवाज सर्वांना भुरळ घालत असतो़ उन्हाळ्यात सकाळी कानावर पडणारा हा आवाज सायंकाळी ७ पर्यंत ऐकावयास मिळत असल्याने रूक्ष वाटणाऱ्या उन्हाळ्यात या स्वरामुळे मनाला एक प्रकारचा आनंद मिळतो़ मात्र मंजुळ आवाजाचा हा पक्षी वातावरण बदलातील परिणामाने नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़
वैज्ञानिकांनी याबाबत केलेल्या संशोधनातून धोक्याच्या पातळीवर असलेल्या पक्ष्यांची नुकतीच यादी जाहीर केली़ कपुकयुलिडी कुळातील कोकीळ पक्षी हा भारतात आढळतो़ कावळ्याएवढाच पण थोडा सडपातळ असणाऱ्या या पक्ष्याचे उन्हाळ्यात सर्वत्र दर्शन होते़ जसजसा दिवस चढत जातो, तसतसा कोकिळेच्या स्वराला साज चढतो़ ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेला वड, पिंपळ, आमराईतून येणारा कोकिळेचा मंजुळ स्वर अनेकांना भुरळ घालतो़ मात्र कोकिळेचे यंदा उन्हाळ्यातील आगमन लांबणीवर पडले असल्याचे दिसून येते़ कोकीळा पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच तिला कंठ फुटतो आणि ती गाऊ लागते़ श्रावण महिन्यापर्यंत तिची गाणी ऐकू येतात़ हिवाळ्यात मात्र हा पक्षी मौन बाळगतो़ मादी कोकिळेला गाता येत नाही़ तर कोकिळा हा त्याचा पंचम स्वरामुळे अत्यंत लोकप्रिय व आवडता पक्षी आहे़ पंचम स्वरातील कोकिळेची आर्तता ऐकणाऱ्याला लुभावते़ गीतकारांनी कोकीळ पक्ष्यावर भरभरून लिहिले आहे़ कवी व लेखकांनी आपल्या साहित्यातून कोकिळेचा मंजुळ स्वरांचा गोडवा मांडला आहे़
या पक्ष्याचे दुसरे वैशिष्टय म्हणजे हा पक्षी कधीही आपले घरटे बांधत नाही़ मादा कोकीळ कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते़ तसेच घरट्याजवळ लपून बसते़ कोकीळ व कावळा यांचे वैर असल्याने कावळा त्यावर तुटून पडतो़ तेव्हा कोकीळ कावळ्याला हुलकावण्या देत घरट्यापासून दूर नेते़ दरम्यान, मादा कोकीळ कावळ्याच्या घरट्यात अंडी पाहून कोकिळेला काम फत्ते झाल्याचे कळते़ पिल्ले बाहेर आल्यावरच कावळाच कोकिळेच्या पिल्लांचे पालन करतात़ ग्रामीण भागात कोकिळेचा सूर निनादतो़ प्रदूषणाचा फटका कोकीळ पक्ष्यांनासुद्धा बसत आहे़ संवर्धनाची गरज व्यक्त होत आहे़
वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम या पक्ष्याच्या संख्येवर होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे़ दिवसेंदिवस घटणारी कोकिळेची संख्या पक्षीप्रेमींमध्ये चिंतेची बाब ठरत आहे़ संवर्धनाकरिता जनजागृती आवश्यक आहे़ (प्रतिनिधी)