नियमांची लावली ‘वाट’
By Admin | Updated: February 17, 2015 00:44 IST2015-02-17T00:36:37+5:302015-02-17T00:44:10+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) शहरात मोंढा नाका, सिडको बसस्थानक आणि बाबा पेट्रोल पंप चौक या तीन ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येत आहे

नियमांची लावली ‘वाट’
औरंगाबाद : महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) शहरात मोंढा नाका, सिडको बसस्थानक आणि बाबा पेट्रोल पंप चौक या तीन ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी करण्यात येत आहे. या कामाच्या ठिकाणी ठेकेदारांनी साईड रोडच्या नियमाचीच वाट लावली आहे. पुलाचे काम सुरू करण्याआधी नियमानुसार साईड रोड बनविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पुलाच्या या कामाची गत ‘असून अडचण नसून खोळंबा’ सारखी झाली आहे. शहरात वाहनांची संख्या १० लाखांच्या वर पोहोचली आहे. ३० ते ४० टक्के वाहने दिवसातून एकदा तरी शहराची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या जालना रोडवरून ये-जा करतात.
४शहरात उभारण्यात येत असलेले तिन्ही उड्डाणपुलांच्या बाजूने ड्रॉर्इंगप्रमाणे आणि नियोजनाप्रमाणे पर्यायी रस्ते तयार करण्यात आले आहेत. तिन्ही उड्डाणपुलांच्या बाजूने सात मीटरचे पर्यायी रस्ते आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता उदय भरडे यांनी दिली.
अधिकाऱ्यांचे अभय?
४तरतुदीनुसार पर्यायी रस्ते तयार करण्यासाठी अनेक बांधकामांवर हातोडा पडण्याची वेळ येण्याची शक्यता दिसून येते.
४बांधकामांवर हातोडा पडण्याच्या भीतीनेच बाबा पेट्रोलपंप येथे उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलास सुरुवातीलाच विरोध करण्यात आला होता.
४पर्यायी रस्त्यांच्या बिकट अवस्थेमुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी बांधकामांना अभय देत असल्याचे दिसून येत आहे.
उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी ठेकेदाराने पुलाच्या दोन्ही बाजूने सात मीटर रुंदीचे साईड रोड बनवावेत. त्यानंतर पुलाच्या कामाला सुरुवात करावी, अशी कंत्राटातच अट घालण्यात आलेली होती.
प्रत्यक्षात या अटीला तिन्ही ठिकाणच्या ठेकेदारांनी बगल दिल्याचे दिसून येते. एक तर काम सुरू करण्यापूर्वीच साईड रोड बनविणे बंधनकारक होते; परंतु ठेकेदारांनी एकीकडे पुलाचे काम सुरू केले आणि मग काही दिवसांनी साईड रोड बनविले.
सदर प्रतिनिधीने पाहणी केली असता हे साईड रोड काही ठिकाणी तीन, काही ठिकाणी साडेतीन मीटरचे आहेत, तर काही ठिकाणी अडीच ते अवघ्या तीन, साडेतीन मीटरचेच. विशेष म्हणजे हे साईड रोड बनविताना खडी टाकून मजबुतीकरण करून नंतर डांबरीकरण करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात या ठेकेदारांनी जुन्या रोडवरच थोडी खडी व डांबराचा थर टाकून थातुरमातुर रस्ते बनविले.