किनवटमध्ये पाणीसंकट
By Admin | Updated: June 5, 2014 00:13 IST2014-06-04T23:40:50+5:302014-06-05T00:13:42+5:30
गोकुळ भवरे, किनवट उन्हाळ्यात भासणार्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ८७ लाख ९६ हजार रुपये किमतीचा आराखडा मंजूर झाला़
किनवटमध्ये पाणीसंकट
गोकुळ भवरे, किनवट उन्हाळ्यात भासणार्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ८७ लाख ९६ हजार रुपये किमतीचा आराखडा मंजूर झाला़ मात्र यात नमूद कामांना अद्याप सुरुवात झाली नसल्याने हा आराखडा कागदावरच आहे़ मारेगाव (वरचे) येथे सहा दिवसांपूर्वी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला़ मात्र टँकरग्रस्त धानोरा (सी़), रामपूर-भामपूर व शिवशक्तीनगर (घोगरवाडी) या तीन गावांचा टँकरचा प्रस्ताव प्रस्तावित आहे़ आता पावसाळ्यात टँकर सुरू करणार का? असा प्रश्न टंचाईग्रस्त गावचे नागरिक विचारत आहेत़ किनवट या डोंगराळ तालुक्यात १९१ गावे १०५ वाडीतांडे आहेत़ २०१३ च्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने यंदाच्या उन्हाळ्यात म्हणावी तशी पाणीटंचाई उद्भवली नाही़ तरीपण पावसाचे पडणारे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता येथील जमिनीत नसल्याने दरवर्षी काही गावांना पाणीटंचाईच्या झळा बसताताच़ २०१३ च्या पावसाळ्यात इस्लामपूर भागात केवळ ७५ टक्क्यांच्या आतच पर्जन्यमान झाल्याने एप्रिलनंतर या भागात पाणीटंचाईचे संकट ओढवेल, असा अंदाज भूजल सर्वेक्षण विभागाचा होता़ आणि तो खराही ठरला़ कारण मार्लागुंडा, दीपलानातांडा, चंदूनाईक तांडा, मानसिंगनाईकतांडा, गोंडमहागाव, दुर्गानगर, शिवनगाव, रामन्नातांडा, व्यंकटापूर, मलकाजांबतांडा, आमरासिंग नाईकतांडा, दत्तनगर (मलकजांब), पांगरी, इरेगाव, सावरगावतांडा यासह तालुक्यातील वडोली, झेंडीगुडा, नागझरी, नागझरी कॅम्प, बेंदीतांडा, चिंचोलीतांडा, दाभाडी, नागरसवाडी, पेंदा, आंजी, लकडकोट, प्रधानसांगवी, घोटी, रायपूरतांडा, दुर्गापेठ, मोहाडा, लिमगुडा, पिंपळगाव फाटा, पिंपरगाव (की़) या गावांना टंचाईचे चटके बसू लागल्याने विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव पं़ स़ च्या पाणीपुरवठा विभागाकडे आले़ विहीर अधिग्रहणाचे एकूण ४० प्रस्ताव आले़ हा आकडा ४७ वर जाण्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला़ उल्लेखनीय म्हणजे, गतवर्षीचे पाणीटंचाई काळातील हातपंप दुरूस्तीचे १ लाख ५० हजार रुपये, बैलगाडीचे १ लाख रुपये, विहीर अधिग्रहणाचे २ लाख आणि टँकर चालकाचे ४० हजार रुपये असे ४ लाख ९० हजार रुपये बजेटच नसल्याने अडकूनच असल्याने विहीर अधिग्रहण करायला शेतकरी मागेपुढे पाहत आहेत़ नवीन विंधन विहिरी घेणे यासाठी ४२ प्रस्ताव प्राप्त झाले़ सर्वेक्षणही झाले़ ३२ प्रस्तावाचे आदेश प्राप्त होवून मंजुरी मिळाली़ पण कामांना काही सुरुवात नाही़ पावसाळ्याच्या तोंडी टंचाईची कामे करून निधीची वाट लावली जाते हे दरवर्षीचे चित्र आहे़ पैनगंगा नदीकाठावरील रामपूर-भामपूर, धानोरा (सि़) व अतिदुर्गम भागातील शिवश्क्तीनगर (घोरगवाडी) या टंचाईग्रस्त व टँकरग्रस्त गावांना टँकर केव्हा सुरू होणार, पावसाळा सुरू व्हायला सहाच दिवस शिल्लक असताना टँकर सुरू होण्याचे कोणतेही चिन्ह नसल्याने तशा गावात मात्र पाणीटंचाईची भीषण समस्या उद्भवू लागली आहे़ हदगाव तालुक्यातील चित्र यापेक्षा वेगळे नाही़ संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पंचायत समितीने जानेवारी ते मार्च या कालावधीसाठी ८० लाख ६ हजार रुपये किमतीचा आराखडा जिल्हा प्रशसनाकडे पाठविला होता़ तेव्हा २३ लाख ९० हजार रुपये किमतीच्या आराखड्याला मंजुरी दिली़ एप्रिल ते जूनपर्यंत १ कोटी १९ लाख ११ हजार रुपये किमतीचा आराखडा पाठविला होता़ तेव्हा ६४ लाख ६ हजार रुपये मंजुरी मिळाली़ मंजुरी मिळूनही आराखड्यातील कामांना सुरुवातच नसल्याने आराखडा सध्यातरी कागदावरच आहे़