तीन दिवसाआड टँकरद्वारे पाणी!
By Admin | Updated: June 9, 2014 01:07 IST2014-06-09T00:50:21+5:302014-06-09T01:07:54+5:30
माळीवाडा : पाणीपुरवठ्याच्या विहिरीने पाण्याचा तळ गाठल्याने मिटमिटा येथील नागरिकांना तीन दिवसाआड टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

तीन दिवसाआड टँकरद्वारे पाणी!
माळीवाडा : पाणीपुरवठ्याच्या विहिरीने पाण्याचा तळ गाठल्याने मिटमिटा येथील नागरिकांना तीन दिवसाआड टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मिटमिट्याची लोकसंख्या चार हजारांच्या आसपास असली तरी अधिकृत नळधारकांची संख्या बोटावर मोजण्याएवढी आहे.
ग्रामस्थांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी गावात अनेक ठिकाणी स्टँडपोस्ट काढण्यात आले आहेत. गावाच्या उत्तरेस असलेल्या तलावात आजही मुबलक प्रमाणात पाणी आहे. जर या तलावालगत नवीन विहिरीचे खोदकाम मनपाने हाती घेतल्यास गावाला दरवर्षी उन्हाळ्यात भासणारी पाणीटंचाई दूर होईल, असे चेअरमन बबनराव मुळे, डॉ. आर.एम. जाधव यांनी सांगितले.
विहिरीजवळ घाणीचे साम्राज्य
गावातील सार्वजनिक विहिरीत सहा टँकरचे पाणी दोन दिवसाआड टाकण्यात येत असून, या विहिरीवरून मिटमिटा, तसेच पडेगावातील तीन-चार वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. या विहिरीजवळ बकऱ्या, तसेच गुरे बांधण्यात येत असल्याने या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. केरकचरा विहिरीत जाऊन पाणी खराब होत आहे. मनपाने या विहिरीभोवती संरक्षक भिंत बांधणे गरजेचे असल्याचे लक्ष्मण बनकर, खंडेराव मुळे यांनी सांगितले. (वार्ताहर)
जलकुंभ ‘असून अडचण, नसून खोळंबा’
गावात २५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जलकुंभात पाणी सोडल्यास हा जलकुंभ चोहोबाजूने गळतो. या गळक्या जलकुंभाची मनपाने एक-दोन वेळा दुरुस्तीदेखील केली होती; मात्र याचाही काही फायदा झाला नसल्याने जलकुंभात पाणी सोडणेच बंद करण्यात आले व विहिरीवरील पंप डायरेक्ट जलवाहिनी जोडून गावात पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे उंचावरील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.