३० लाख लिटर पाणीपुरवठा टँकरने
By Admin | Updated: June 15, 2014 00:55 IST2014-06-15T00:50:07+5:302014-06-15T00:55:23+5:30
औरंगाबाद : महापालिका रोज ३० वसाहतींना ३ एमएलडी म्हणजेच ३० लाख लिटर पाणीपुरवठा टँकरने करीत असल्याचे स्पष्टीकरण मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

३० लाख लिटर पाणीपुरवठा टँकरने
औरंगाबाद : महापालिका रोज ३० वसाहतींना ३ एमएलडी म्हणजेच ३० लाख लिटर पाणीपुरवठा टँकरने करीत असल्याचे स्पष्टीकरण मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
३० वॉर्डांतील सुमारे ५० हजार नागरिक टँकरचे पाणी पीत आहे. टँकरचे पाणी खरंच नागरिकांना मिळते की दुसरीकडे कुठे मुरते हा संशोधनाचा विषय ठरू पाहत आहे. सध्या सहा प्रभागांमध्ये ५८ टँकरने पाणीपुरवठा होत असून त्याच्या ५०० फेऱ्या होत आहेत.
एक टँकर ८ फेऱ्या मारीत असल्याचे यांत्रिकी विभागाने कळविले आहे. यामध्ये ५ हजार लिटरचे ४७ टँकर आहेत, तर ११ टँकर १० हजार लिटरचे आहेत. मनपा सध्या ५८ टँकरने पाणीपुरवठा करीत असल्याचे यांत्रिकी विभागाचे उपअभियंता यू.जी. शिरसाठ यांनी सांगितले.
मनपा ३० वॉर्डांत टँकरने पाणीपुरवठा करीत आहे, तर मग १०० हून अधिक समाजसेवकांचे टँकर कोणत्या वसाहतीत जातात, किती नागरिकांना ते पाणीपुरवठा करतात याचा हिशेब लागत नाही. समाजसेवकांच्या मोफत जलसेवांचे टँकर जर याच वसाहतींमध्ये जात असतील, तर मनपाही त्याच वसाहतींमध्ये पाणीपुरवठा करते का, असा सवाल आहे.
दरवर्षी खाजगी टँकर, डिझेलवर पालिका दीड कोटी रुपये खर्च करते.
या वसाहती टँकरवर
प्रभाग ‘अ’ व ‘ड’मधील पडेगाव, मिटमिटा, पेठेनगर, खुशबू कॉलनी, पहाडसिंगपुरा, हर्सूल, हिमायतबाग भागांत टँकरने पाणीपुरवठा होतो. प्रभाग ‘ब’ व ‘क’मधील मिसारवाडी, जाधववाडी, म्हसोबानगर, भगतसिंगनगर, केशरदीप, छत्रपतीनगर, माऊलीनगरमध्ये, तर प्रभाग ‘ई’ व ‘फ’मधील जयभवानीनगर, गुरुदत्तनगर, रामनगर, रेणुकानगर, आनंदनगर, अबरार कॉलनी, महूनगर, गणेशनगर, हनुमाननगर, संतोषीमातानगर, गारखेडा परिसरात टँकरने पाणीपुरवठा होतो, असे मनपाने स्पष्ट केले. या भागात मोफत जलसेवेचे टँकर येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
५० हजार नागरिकांना टँकरचे पाणी
सुमारे ५० हजार नागरिकांना मनपा टँकरने पाणीपुरवठा करीत असल्याचे ५८ टँकरच्या फेऱ्यांवरून दिसते. मात्र, तेवढ्या नागरिकांपर्यंत टँकरचे पाणी पोहोचत नसून काही फेऱ्या कागदोपत्रीच दाखविल्या जात असल्याचा आरोप पालिकेवर होत आहे. दुसरीकडे टँकरच्या मागणीसाठी नागरिक पालिकेला रोज निवेदन देत आहेत.
फेऱ्यांचे चक्र असे...
५ हजार लिटरचे टँकर ४७ आहेत. त्यात मनपाचे ४ तर ४३ खाजगी टँकर आहेत. त्याच्या अंदाजे ४३० फेऱ्या होतात. त्यातून २२ लाख ४० हजार लिटर पाणीपुरवठा केला जातो.
१० हजार लिटरचे मनपाचे ७, खाजगी ४, असे ११ टँकर आहेत. त्यांच्या ८८ फेऱ्या होतात. ९ लाख लिटर पाणी त्या टँकरमधून पुरविले जाते. एकूण ३१ लाख २० हजार लिटर पाणी टँकरने दिले जाते.
प्रभागमनपाचे टँकरखाजगी टँकर एकूण
अ व ड ०४१०१४
ब व क०४०९१३
ई व फ०३२८३१
एकूण११४७५८