बदनापूर तालुक्यात पाणीटंचाई
By Admin | Updated: July 24, 2014 00:14 IST2014-07-23T23:50:15+5:302014-07-24T00:14:23+5:30
दिलीप सारडा , बदनापूर पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीसुध्दा बदनापूर तालुक्यात पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

बदनापूर तालुक्यात पाणीटंचाई
दिलीप सारडा , बदनापूर
पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीसुध्दा बदनापूर तालुक्यात पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
तालुक्यात यावर्षी अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस झाला. काही भागात अद्यापही पेरणी झालेली नाही. तालुक्यात काही भागात थोडासा पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस, तूर, बाजरी, सोयाबीन अशा खरीप पिकांची पेरणी केलेली आहे; परंतु पावसाने दडी मारल्यामुळे यातील काही पिके उगवल्यानंतर वाळत आहेत.
काही पिके उगवली नसल्यामुळे या पिकांचे बियाणे खराब झाले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. काही शेतकऱ्यांनी खरीप पेरणीकरिता घरातील सोने-नाणे बँकांकडे गहाण ठेवून, काहींनी खाजगी सावकारांकडून कर्ज काढून तर काहींनी धान्य विक्रीतून खरीप हंगामासाठी बियाणे खतांची सोय केली. धरणीमातेची ओटी भरली. आता पाऊसच पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना काय करावे, हे कळेनासे झाले आहे.
यापूर्वी रबी व उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांची गहू, ज्वारी, हरभरा ही पिके मोसंबी, आंबा या फळबागा पाऊस व गारपिटीमुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. यामुळे शेतकरी रबी व खरीप या दोन्ही हंगामात निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी भरडला जात आहे. या भागातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
शासन उदासीन
या तालुक्यात जर कृत्रिम पाऊस पाडला असता तर शेतकऱ्यांची पेरणी होऊन खरीप पिकांना दिलासा मिळाला असता मात्र कृत्रिम पावसाकरिता शासनच उदासीन राहीले. तसेच या तालुक्यातील पर्जन्यमानाचा विचार करून लोकप्रतिनीधींनीही शासनाकडे कृत्रिम पावसाची मागणी लावून धरली नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पिण्याच्या पाण्याची टंचाई
तालुक्यात पाऊस पडत नसल्यामुळे अर्धा पावसाळा झाला तरीही तालुक्यातील नदी, नाले कोरडेच आहेत. तसेच या तालुक्यात असलेले वाल्हा व राजेवाडी येथील साठवण तलाव व सोमठाणा येथील अप्पर दुधना धरण व अनेक कोल्हापुरी बंधारे अद्यापही कोरडेच आहेत. यामुुळे या तालुक्यातील पाणीपातळी वाढली नाही. अनेक गावांतील विहिरी व हातपंप कोरडे झाले आहेत. परिणामी, अनेक गावांत भर पावसाळ्यात ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
सध्या या तालुक्यातील नानेगाव, कुसळी,कडेगाव,राजेवाडी व अंतर्गत दोन वाडया, मांजगाव, वंजारवाडी व अंतर्गत तीन वाड्या, धोपटेश्वर, देवपिंपळगाव, ढोकसाळ या गावांना टँकरने पिण्याचा पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच तालुक्यातील खडकवाडी, परदेशवाडी, हालदोला, कुंभारी, बदनापूर, पाडळी, मात्रेवाडी,खामगाव, ढासला, पीरवाडी, मालेवाडी, अकोला, भिलपुरी, गोकुळवाडी तांडा आदी गावांना खाजगी विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा केल्या जात आहे. तसेच या तालुक्यातील वाकुळणी,बाजार वाहेगाव, बदनापूर, दूधनवाडी, आसरखेडा, म्हसला-भातखेडा, तळणी-लोधेवाडी, चित्तोडा, आसोला, कंडारी बु,खामगाव, भाकरवाडी, वाघु्रळ, नांदखेडा, जवसगाव, सिरसगाव घाटी, पीरसावंगी, कंडारी खु, डोंगरगाव सा, सोमठाणा आदी गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे येथील पाणीपुरवठा विभागाने सुधारित प्रस्तावाकरिता शिफारस केली आहे.