शहराच्या पाणीपुरवठ्याला ‘हाय अलर्ट’चा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:41 IST2017-11-14T00:41:32+5:302017-11-14T00:41:34+5:30
छावणी भागात दूषित पाण्यामुळे तब्बल २७०० नागरिकांना गॅस्ट्रो झाल्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे. शहरात अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी मनपाच्या पाणीपुरवठ्याला हाय अलर्टचे आदेश देण्यात आले

शहराच्या पाणीपुरवठ्याला ‘हाय अलर्ट’चा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : छावणी भागात दूषित पाण्यामुळे तब्बल २७०० नागरिकांना गॅस्ट्रो झाल्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे. शहरात अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी मनपाच्या पाणीपुरवठ्याला हाय अलर्टचे आदेश देण्यात आले असून, छावणी भागात नागरिकांना गॅस्ट्रो कशामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी मनपाच्या शहर अभियंत्यांकडे चौकशी सोपविण्यात आली आहे. २४ तासांमध्ये अहवाल द्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिका जायकवाडीहून दररोज १३५ एमएलडी पाणी शहरात आणते. त्यातील ३ ते ४ एमएलडी पाणी मनपा छावणी परिषदेला देते. परिषद आपल्या सोयीनुसार नागरिकांना पाणीपुरवठा करते. शनिवारी रात्री अचानक या भागातील नारिकांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. अवघ्या ४८ तासांमध्ये रुग्णसंख्या तब्बल २७०० पर्यंत गेली. त्यामुळे मनपा प्रशासनही हादरले. सोमवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी छावणीत जाऊन रुग्णांची पाहणी केली. महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणाही संपूर्णपणे छावणी परिषदेला मदत करीत आहे. औषधीही देण्यात आली आहे. माणुसकीच्या नात्याने महापालिका छावणी परिषदेच्या मदतीला धावून गेल्याचे महापौरांनी पत्रकारांशी नमूद केले.
शहरातही गॅस्ट्रोची साथ उद्भवू नये यासाठी हाय अलर्टचा इशारा मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला देण्यात आला. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये दूषित पाणीपुरवठा होऊ नये यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लाइनमन बांधवांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. छावणी भागात मनपाकडून पाणी कशा पद्धतीने देण्यात येते. खराब व्हॉल्व्ह कोठे होता, दूषित पाण्याचे मिश्रण कुठे झाले, या सर्व प्रश्नांचा शोध घेण्याची जबाबदारी महापौरांनी शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यावर सोपविली. त्यांनी २४ तासांमध्ये आपला अहवाल द्यावा, असेही सांगण्यात आले.