हुडहुडीतही पाण्यासाठी भटकंती
By Admin | Updated: December 25, 2014 00:48 IST2014-12-25T00:40:44+5:302014-12-25T00:48:12+5:30
औरंगाबाद : शहरातील सर्वच भागांमध्ये आज नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. थंडीच्या दिवसांमध्ये नागरिकांनी पाण्यासाठी या वॉर्डातून त्या वॉर्डात धावपळ केली.

हुडहुडीतही पाण्यासाठी भटकंती
औरंगाबाद : शहरातील सर्वच भागांमध्ये आज नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. थंडीच्या दिवसांमध्ये नागरिकांनी पाण्यासाठी या वॉर्डातून त्या वॉर्डात धावपळ केली. २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस हा सण असून, तो सण आता पाण्याविना साजरा करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
सोमवारी रात्री फारोळा येथील डिलिव्हरी लाईनला भगदाड पडल्यामुळे दोन दिवसांपासून सिडको-हडकोसह सर्व शहरात पाण्याची बोंब झाली आहे. शुक्रवारी व शनिवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा झाला होता, त्यांना बुधवारीही पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे तब्बल पाच दिवस निर्जळीला सामोरे जावे लागल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. महागड्या टँकर्सचे पाणी त्यांना विकत घ्यावे लागले.
सिडको-हडकोमध्ये पाण्याचे वेळापत्रक कोलमडले. पाच दिवसांपासून २२ वॉर्डांमध्ये पाणीपुरवठा झालेला नाही. बुधवारीही त्या वॉर्डांपैकी बहुतांश ठिकाणी निर्जळी होती. नागरिकांना ३०० रुपयांप्रमाणे टँकर विकत घ्यावे लागले. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने टँकरने पाणीपुरवठा करण्यास उशीर केल्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
टँकरचे भाव चढले...
साधारणत: २५० रुपयांना २ हजार लिटर टँकरचा दर आहे. ते टँकर दोन दिवसांपासून ३०० रुपयांपेक्षा जास्त भावाने विक्री होत आहे. सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने टँकर न पाठविल्याने सिडको-हडकोमध्ये खाजगी टँकरचे पाणी नागरिकांना विकत घ्यावे लागले.
गारखेडा, उल्कानगरी, ज्योतीनगर, रेल्वेस्टेशन, सिल्कमिल कॉलनी, ज्युबिली पार्क परिसरात खाजगी टँकरने पाणीपुरवठा झाला. सिडको-हडकोतील चाकरमान्यांचे हाल झाले. काही कर्मचाऱ्यांनी अर्ध्यावर सुटी टाकून पाणी भरण्यासाठी घर गाठले होते.
मात्र पाणीपुरवठाच झाला नाही. दरम्यान, कंपनीने असा दावा केला आहे की, शहरात पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.
महापौरांच्या वॉर्डासह अनेक भागांत ठणठणाट
विद्यानगर या महापौर कला ओझा यांच्या वॉर्डातदेखील आज पाणीपुरवठा झाला नाही. उस्मानपुरा, पीरबाजार, ज्योतीनगर, दशमेशनगरमध्ये आज पाणी आले नाही. पुंडलिकनगर जलकुंभावर नागरिकांनी पाण्यासाठी सकाळी गर्दी केली होती.
सकाळी ११.३० वा. त्या भागाला पाणीपुरवठा झाला. दुपारी नगरसेविका ऊर्मिला चित्ते, नितीन चित्ते व नागरिकांनी एन-७ जलकुंभावरील कर्मचाऱ्यांशी संपर्क केला.
कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. कुणीही प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी एन-५ जलकुंभाकडे धाव घेऊन पवननगर, हडकोमध्ये पाणीपुरवठा केव्हा होणार याची विचारणा केली. ५ मिनिटांत फोन करून सांगतो, असे उत्तर देऊन संबंधिताने फोन बंद केला. त्यामुळे चित्ते संतापले. मनपाच्या अधिकाऱ्यांनीदेखील हात वर केल्यामुळे पाणीपुरवठा केव्हा होणार हे कुणीही न सांगितल्याने चित्ते दाम्पत्य घरी परतले.
शांतीपुरा येथील नागरिकांनी ज्युबिली पार्क जलकुं भावर आंदोलन केले. पाणीपुरवठा करावा, अशी त्यांची मागणी होती. त्यानंतर सिल्कमिल कॉलनीतीन नागरिकांनी परिसरात आधी पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी आंदोलन केले.
पडेगाव, मिटमिटा विकास कृती समितीचे लतीफ पटेल यांनी कोटला कॉलनी जलकुंभावरील धोंडिराम बनकर हा कर्मचारी टँकरसाठी पैसे घेऊन पाणीपुरवठा करीत नसल्याचा आरोप केला.