अनुदानाच्या रकमेसाठी चोवीस तास प्रतीक्षा
By Admin | Updated: May 22, 2014 00:14 IST2014-05-21T23:44:09+5:302014-05-22T00:14:06+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (खुर्द) येथील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतील इंटरनेट सेवा २ मे पासून बंद पडली आहे.

अनुदानाच्या रकमेसाठी चोवीस तास प्रतीक्षा
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (खुर्द) येथील उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेतील इंटरनेट सेवा २ मे पासून बंद पडली आहे. त्यामुळे तीन गावातील शेतकर्यांच्या अनुदान वाटपात व्यत्यय येत असून, यामुळे त्रस्त झालेल्या शेतकर्यांनी बुधवारी शाखाधिकार्यांना घेराव घालून संताप व्यक्त केला. पिंपळा (खुर्द), धोत्री व देवकुरळी या तीन गावांसाठी पिंपळा (खुर्द) येथील शाखेत गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या अनुदानाची रक्क़म जमा करण्यात आली आहे. बँकींग सेवा आॅनलाईन असल्याने येथे बीएसएनएल विभागाची इंटरनेट सेवा जोडण्यात आली आहे. परंतु, ही सेवा गेल्या दोन मे पासून बंद पडली आहे. परिणामी वीस दिवसांपासून बँकेच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या गारपीटग्रस्तांना शासनाच्या वतीने देण्यात येत असलेल्या अनुदानाची रक्क़म या बँक शाखेत जमा करण्यात आली आहे. तीन गावांसाठी एक कोटी दहा लाख रूपये जमा असून, देवकुरळी, धोत्री व पिंपळा गा गावातील शेतकर्यांना त्याचे वाटप करण्यात येत आहे. परंतु, सध्या बँकेची इंटरनेट सेवा बंद पडल्याने शेतकर्यांना विड्रॉल स्लीप भरून दिल्यानंतर पैसे हातात पडण्यासाठी तब्बल चोवीस तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे. या शाखेत स्लीप दिल्यानंतर ती सावरगाव शाखेत आॅनलाईन करून यानंतर रक्कम वाटप अथवा जमा केली जात आहे. यानंतर दुसर्या दिवशी पैशांचे वाटप होते. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या शाखेतून दोन हजारावर शेतकर्यांना या अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे. आजवर केवळ पिंपळा (खुर्द) येथील पन्नास टक्के शेतकर्यांना याचे वाटप झाले आहे. बुधवारीही अनुदानाची रक्कम उचलण्यासाठी शेतकर्यांनी बँकेसमोर मोठी गर्दी केली होती. परंतु, रक्कम मिळत नसल्याने संतप्त शेतकर्यांनी शाखाअधिकार्यांना घेराव घालून नंतर शाखेसमोर ठिय्या मारला. तसेच यावेळी एका माजी सैनिकाने ठेवीचे पैसे तरी लवकर द्या, अशी मागणी केली. (वार्ताहर) एका अधिकार्यावर शाखेचा कारभार पिंपळा (खुर्द) बँक शाखेत ना कॅशियर कार्यरत आहे ना शिपाई. त्यामुळे सर्व कारभार शाखाधिकारी एस. सी. यांनाच सर्व कामे करावी लागतात. तीन गावातील २६ हजार शेतकर्यांना अनुदान वाटपाबरोबरच कॅश आणणे, बँकिंग कार्यप्रणाली पूर्ण करणे आदी नियमित कामांचाही भार सांभाळताना त्यांची चांगलीच धावपळ होत आहे. त्यातच इंटरनेट सेवा बंद पडल्याने कामकाजात व्यत्यय येत आहे. त्यामुळे येथे आणखी कर्मचार्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. याबाबत शाखाधिकारी कुर्ले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, २ मे पासून संगणक कार्यप्रणाली बंद पडल्याने कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. अनुदान घेण्यासाठी शेतकर्यांची दररोज गर्दी होत आहे. मात्र, अनुदान वाटपास विलंब होत असल्याने ते संतप्त होत आहेत. सध्या सावरगाव येथून संगणक कार्यप्रणालीद्वारे बँकींग सेवा पूर्ण करून नंतर अनुदान वाटप करण्यात येत असून, येथे आणखी एका कर्मचार्याची गरज असल्याचे ते म्हणाले.