आठ जिल्ह्यांसाठी व्हिजन-२०२५

By Admin | Updated: May 8, 2014 23:52 IST2014-05-08T23:51:21+5:302014-05-08T23:52:09+5:30

औरंगाबाद : मराठवाड्याच्या नियोजनबद्ध विकासासाठी शासनाच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांनी व्हिजन-२०२५ तयार करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज दिल्या.

Vision-2025 for eight districts | आठ जिल्ह्यांसाठी व्हिजन-२०२५

आठ जिल्ह्यांसाठी व्हिजन-२०२५

 औरंगाबाद : मराठवाड्याच्या नियोजनबद्ध विकासासाठी शासनाच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांनी व्हिजन-२०२५ तयार करावे, तसेच त्याचा उपयोग पुढील १० वर्षांच्या वाटचालीसाठी करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी शासनाच्या विविध प्रादेशिक कार्यालयांच्या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत विभागीय आयुक्त जयस्वाल यांनी वरील सूचना दिल्या. बैठकीला कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार, पोलीस, भूमी अभिलेख, जलसंपदा, महसूल, वने, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आदी विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रशासकीय कामात गतिशीलता येण्यासाठी, तसेच भविष्यातील नियोजनबद्ध विकासासाठी व्हिजन-२०२५ तयार करण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. त्यानुसार मराठवाड्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या प्रादेशिक प्रमुखांनी तातडीने कामाला लागावे, तसेच शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामाचा ठसा उमटावा यासाठी डिसेंबर २०१४ अखेर पूर्ण होऊ शकणार्‍या निवडक कामांवर कार्यवाहीही सुरू करावी, असे जयस्वाल यांनी सांगितले. राज्य शासनाने गतिमान प्रशासनाच्या परिणामकारक कार्यवाहीसाठी वेळावेळी शासन निर्णय व परिपत्रकाद्वारे निर्देश दिले. शासनाच्या प्रत्येक विभागीय कार्यालयाने त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. प्रशासकीय कार्यालयातील सुधारणांच्या विविध बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे. अधिनस्त कार्यालयांनादेखील त्यासाठी कार्यवाही करण्यास सांगावे. नागरिकांची सनद, कार्यालयातील सीसीटीव्ही, लोकप्रतिनिधींच्या पत्रांवरील कार्यवाही, अभिलेख कक्ष, महिला अधिकारी-कर्मचार्‍यांसाठीच्या सुविधा, विशाखा समित्या कार्यक्षम करणे आदींवरही लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. विभागीय आयुक्त दरमहा घेणार आढावा विभागीय आयुक्त जयस्वाल हे यापुढे स्वत: प्रत्येक महिन्याला व्हिजन-२०२५ च्या कामाचा आढावा घेणार आहेत. प्रादेशिक कार्यालयांनी व्हिजन-२०२५ तयार करण्याचे काम वेगाने करावे, तसेच त्यातील काही गोष्टींची अंमलबजावणी चालू वर्ष संपण्यापूर्वीच सुरू करावी, असे आयुक्तांनी सांगितले. त्याचाही आढावा प्रत्येक बैठकीत घेतला जाणार आहे. शासनाची सर्व कार्यालये स्वतंत्र घटक म्हणून काम करत असतात; पण त्यांच्या कामात एकसारखेपणा आणल्यास त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. शिवाय व्हिजन असेल तर पुढील वाटचाल गतीने होऊ शकते, म्हणून हा निर्णय घेतला आहे. - संजीव जयस्वाल, विभागीय आयुक्त

Web Title: Vision-2025 for eight districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.