विद्यापीठ प्रशासनच जबाबदार
By Admin | Updated: May 9, 2014 00:01 IST2014-05-09T00:01:13+5:302014-05-09T00:01:46+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाला घरघर लागल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर या वृत्ताची शैक्षणिक क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली.

विद्यापीठ प्रशासनच जबाबदार
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाला घरघर लागल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर या वृत्ताची शैक्षणिक क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली. मराठी भाषेविषयी अस्मिता असणार्या आणि विद्यापीठाच्या मराठी विभागावर प्रेम करणार्या मंडळींनी विभागाच्या या अवस्थेला विद्यापीठ आणि प्राध्यापकांतील विसंवाद जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागाच्या २०१३-१४ या शैक्षणिक वर्षासाठी २७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यापैकी ८ विद्यार्थ्यांनीच परीक्षेला हजेरी लावल्याचे समोर आले होते. एवढेच नव्हे तर सहा वर्षांपूर्वी विभागाने सुरू केलेल्या एकवर्षीय पदविका अभ्यासक्रमाकडेही विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबत लोकमतने ३ मे रोजी ‘विद्यापीठातील मराठी विभागाला लागली घरघर’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तावर शहरात जोरदार चर्चा सुरू झाली. मराठी विभागाच्या या अवस्थेला जबाबदार कोण याविषयी जाणकारांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न सदर प्रतिनिधीने केला. मान्यवरांनी मराठी विभागास विद्यापीठ प्रशासनच जबाबदार असल्याचे मत व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता भगत म्हणाले की, विद्यापीठ आणि मॅनेजमेंट कौन्सिलने गुणवत्तेचा विचार न करता तालुका आणि जिल्हास्तरावरील विविध कॉलेजला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली. तेथे सक्षम प्राध्यापक, लायब्ररी आहे अथवा नाही याची देखील शहानिशा करण्यात आली नाही. या सेंटरवर प्रवेश घेतला की पदवी मिळते, एवढेच नव्हे तर सेंटरचे अनुदान बंद होणार नाही याची काळजी घेण्यासाठी अपप्रवृत्तींकडे कानाडोळा केला जातो आणि विद्यार्थ्यांना सवलती दिल्या जातात. शिवाय एम. ए. मराठी झाल्यानंतर नोकरी मिळण्याची हमी नाही, हेसुद्धा विद्यार्थी गळतीस कारणीभूत आहे. प्रा. ऋषिकेश कांबळे म्हणाले की, एकतर असंख्य महाविद्यालयांना पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मान्यता दिली. तेथे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये सवलत दिली जाते. त्यामुळे विद्यार्थी विद्यापीठाकडे येण्यास उत्सुक नसतात; सत्र पद्धती, मराठी विभागातील प्राध्यापकांचा परस्पर विसंवाद, असूया, विद्यापीठातील शिक्षणाबद्दल पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात असलेले गैरसमजही मराठी विभागाच्या घरघरीस कारणीभूत आहेत. विवेकानंद कॉलेजमधील मराठी विभागप्रमुख डॉ. दिलीप महालिंगे म्हणाले की, आमच्या महाविद्यालयात प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील दरी आम्ही कमी केली आहे. परिणामी प्राध्यापकांबद्दल त्यांच्या मनात कोणतीही भीती न राहता ते कधीही शिक्षकांशी बिनधास्तपणे संवाद साधून त्यांची समस्या सोडवून घेतात. गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता त्यांना शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थी विद्यापीठाऐवजी महाविद्यालयास पसंती देतात.