भूमिगत मार्गास मुहूर्त लागेना!
By Admin | Updated: June 18, 2014 01:45 IST2014-06-17T22:53:39+5:302014-06-18T01:45:14+5:30
जालना : जालना रेल्वे स्थानकाच्या उत्तर विभागात राहणाऱ्या रहिवाशांनी रेल्वे क्रॉसिंगजवळ भूमिगत मार्ग उभारण्याची मागणी शेकडो निवेदनाव्दारे केली.

भूमिगत मार्गास मुहूर्त लागेना!
जालना : जालना रेल्वे स्थानकाच्या उत्तर विभागात राहणाऱ्या रहिवाशांनी रेल्वे क्रॉसिंगजवळ भूमिगत मार्ग उभारण्याची मागणी शेकडो निवेदनाव्दारे केली. परंतु दक्षिण मध्य रैल्वे विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने या प्रश्नावर आजवर गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे या भागातील रहिवासी दररोज हैराण होत आहेत.
रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडे हजारो नागरिक वास्तव्यास आहेत़ परंतु या नागरिकांना विशेषत: मुलाबाळांना रेल्वे क्रॉसिंंग ओलांडून ये-जा करावी लागत आहे़ रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक ७८ जवळ उत्तरेकडील नागरिकांसाठी भूमिगत मार्ग उभारण्याची आवश्यकता आहे़ यासंदर्भात दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या भागातील नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केला़ मात्र न्याय मिळाला नाही़ रेल्वेचे विभागीय प्रबंधक गेल्यावर्षी २४ जुलै रोजी दौऱ्यावर आले होते़ त्यापाठोपाठ गेल्या रविवारीसुद्धा नांदेड येथील व्यवस्थापकांनी येथील रेल्वेस्थानकाचा दौरा केला. परंतु या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहिले नाही. गेल्यावर्षीच्या दौऱ्यात या भागातील संतोषकुमार जाधव, बाळकृष्ण पाठक, के़एस़ जाधव, संजय गायकवाड, गौतम वाघमारे यांनी व्यवस्थापकांची भेट घेतली़ एक सविस्तर निवेदन सादर केले होते. या भागातील नागरिकांच्या व्यथा व्यक्त केल्या़ याची दखल घेतली जाईल, अशी ग्वाही त्यावेळी व्यवस्थापकांनी दिली होती. दुर्दैवाने त्यास एक वर्षे उलटल्यानंतरसुद्धा एका ओळीनेही कारवाई झाली नाही. यावर्षी व्यवस्थापकांचा दौरा झाल्यानंतर स्थिती जैसे थे आहे. त्यामुळे या भागाताील हजारो नागरिकांना हा प्रश्न सुटेल की नाही, याविषयी कमालीची संभ्रमावस्था आहे. (प्रतिनिधी)
धोकादायक वाहतूक
गेट क्रमांक ७८ वरून नागरिक ये-जा करतात. परंतु हे गेट वारंवार बंद होते़ दिवसभरातून सुमारे पाच तास हे गेट बंदच असते़ त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना या क्रॉसिंगवरून ये-जा करणे धोकादायक बनले आहे़
आपत्कालीन स्थितीत एखाद्या रुग्णास रेल्वे क्रॉसींगजवळ ताटकळत थांबावे लागत आहे़ त्यामुळे प्रकार जिवघेणा ठरतो आहे. या मार्गावरून दिवसभरात एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांसह जवळपास ५० गाड्या दररोज ये-जा करीत असतात. त्यामुळे येथील गेट किमान पाच तास बंद असते.
रेल्वे क्रासींगजवळ एक मोठा नाला आहे़ या नाल्याची थोडी दुरूस्ती केल्यास तेथून दुचाकी व तीन चाकी वाहन धारकांना ये-जा करणे सोईचे होईल, अशी प्रतिक्रीया या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे़