समाजसेवकांना फुकटात टँकर
By Admin | Updated: June 14, 2014 01:20 IST2014-06-14T01:19:29+5:302014-06-14T01:20:18+5:30
विकास राऊत, औरंगाबाद महापालिकेच्या एन-५, एन-७ आणि कोटला कॉलनी येथील जलकुंभांवर समाजसेवकांचे हजारो लिटर्सचे सुमारे १०० टँकर रोज फुकटात भरून दिले जातात.
समाजसेवकांना फुकटात टँकर
विकास राऊत, औरंगाबाद
महापालिकेच्या एन-५, एन-७ आणि कोटला कॉलनी येथील जलकुंभांवर समाजसेवकांचे हजारो लिटर्सचे सुमारे १०० टँकर रोज फुकटात भरून दिले जातात. या टँकरचे कुठेही रेकॉर्ड नाही. ते पाणी कुठे नेऊन देतात, कोणत्या वसाहतींमध्ये ते पाणी दिले जाते याची कुठेही नोंद नसल्यामुळे समाजसेवेच्या नावाखाली पालिकेचे पाणी विकले जात असल्याची शक्यता आहे.
समाजसेवकांनी स्वत:च्या खर्चातून टँकर उपलब्ध करून दिलेले आहेत. मोफत जलसेवा म्हणून काही भागांमध्ये सुरळीत पाणीपुरवठाही होत असल्याचे दिसते. मात्र, त्याची नोंद नसल्याचा फायदा पालिकेतील काही महाभाग घेतात. मनपाने किरायाने लावलेले व स्वमालकीच्या टँकर्सची नोंद ठेवली जाते. मात्र, समाजसेवकांच्या टँकर्सना किती पाणी दिले जाते याची कोणतीही नोंद पालिका ठेवत नाही. किंबहुना ते पाणी कोणत्या भागातील नागरिकांना दिले जाते हेदेखील पाहिले जात नाही. महिनाभरापासून शहरात पाण्यासाठी ओरड होत आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रमाण वाढत आहे.
मनपाचा रोज १ लाखाचा खर्च
अमुल लॉरी सर्व्हिसेस एजन्सीच्या ५८ टँकरवर रोज १ लाख रुपये पालिका खर्च करीत आहे. एका टँकरसाठी रोज २ हजार रुपये आणि प्रतिकिलोमीटर २६ रुपये ७० पैसे इतकी रक्कम मनपा अदा करीत आहे. शहरात मनपाचे ११ व अमुलचे ५८ टँकर सुरू आहेत. एक टँकर दिवसाकाठी ८ फेऱ्या मारते. ६४ टँकरच्या ५१२ फेऱ्या रोज होण्याचे प्रमाण येते. हे टँकर पालिका कुठे देते, कोणत्या वॉर्डात किती टँकरच्या फेऱ्या होतात, टँकर क्रमांकांची यादी, त्याचे मालक कोण आहेत, टँकरच्या पाणीपुरवठ्याची नोंद कशी होते, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही.
पाणी कुठे जाते हे तपासावे
मोफत जलसेवेच्या नावाखाली टँकर जाते कुठे याची मनपाने नोंद ठेवलीच पाहिजे. शेकडो टँकर्सने पाणी जात असल्यामुळे मनपाच्या इतर पाणीपुरवठ्यावर ताण येतो. समाजसेवा म्हणून कुणी टँकर नेत असले तरी ते कुठे घेऊन जातात. त्या टँकरचे चालक पाणी कुठे विकत तर नाहीत ना हे तपासणे पालिकेचे काम आहे, असे उपमहापौर संजय जोशी म्हणाले.
शहर अभियंता म्हणाले...
टँकरची दररोज नोंद ठेवली जाते. रोज सुमारे ५०० फेऱ्या होतात. मोफत जलसेवा देणाऱ्यांच्या टँकरची नोंद नाही. ते मोफत भरून दिले जातात, असे शहर अभियंता एस.डी. पानझडे म्हणाले.