लोकसभा निकालामुळे तुळजापूरचे गणितही अवघड
By Admin | Updated: June 12, 2014 01:39 IST2014-06-12T01:09:48+5:302014-06-12T01:39:11+5:30
संतोष मगर , तामलवाडी तुळजापूर विधानसभा मतदारसंघ गेल्या १५ वर्षापासून आमदार तथा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या रुपाने काँग्रेस (आय) पक्षाच्या ताब्यात आहे.

लोकसभा निकालामुळे तुळजापूरचे गणितही अवघड
संतोष मगर , तामलवाडी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघ गेल्या १५ वर्षापासून आमदार तथा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या रुपाने काँग्रेस (आय) पक्षाच्या ताब्यात आहे. तालुक्यात स्थानिक संस्थावर काँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ३५ हजारांचे मताधिक्य महायुतीच्या उमेदवाराला मिळाले आहे. आजवर तुळजापूरचा आमदार हा धोतर नेसणाराच निवडून देण्याची परंपरा मतदारांनी जोपासली आहे.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांना ११०० मतांनी आघाडी तुळजापूर मतदारसंघातून मिळाली होती. यावेळी खा. रवींद्र गायकवाड यांच्या पारड्यात या मतदारसंघाने ३५ हजारांचे मताधिक्य टाकले. त्यामुळे मतदारराजा पुन्हा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या पाठीशी राहील, हे राजकीय गणित मांडणे सध्यातरी धोक्याचे आहे. केंद्रात महायुतीची सत्ता आल्याने तुळजापूर तालुक्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. तुळजापूरची जागा महायुतीच्या कोट्यातून भाजपासाठी सुटली. सध्या महायुतीचा उमेदवार कोण, हे स्पष्ट नाही; पण पालकमंत्री चव्हाण, देवानंद रोचकरी हे दोघे जण निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सलग १५ वर्ष तालुक्यात झालेली विकास कामे, स्थानिक संस्थावर असलेले वर्चस्व यातून विद्यमान आमदाराला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत रोचकरी यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता.
तुळजापूर विधानसभा मतदार संघात उस्मानाबाद तालुक्यातील ७२ गावांचा समावेश तुळजापूरमध्ये असल्याने सर्वच राजकीय उमेदवारांना प्रचाराला जोरा द्यावा लागणार आहे. तुळजापूर पंचायत समितीवर स्वतंत्र काँग्रेसच्या ताब्यात आहे. तर बाजार समिती, साखर कारखाना, सूतगिरणी या संस्थावर काँग्रेस व राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. मात्र महायुतीकडे सध्या कोणतीही सत्तास्थाने नाहीत. त्यामुळे मातब्बरांसमोर कोण टक्कर देणार याकडे लक्ष लागले आहे. तुळजापूर तालुक्याला जि.प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद मिळाल्याने काँग्रेसने जि.प.तील सत्ता कायम ठेवली आहे.
काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीत दाखल झालेले अॅड. दीपक आलुरे, वसंत वडगावे यांच्यामुळे काय परिणाम होतो, हेही पहावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले अपक्ष उमेदवार रोहन देशमुख काय भूमिका घेणार यावरही लढतीचे चित्र अवलंबून राहणार आहे. गत निवडणुकीत उस्मानाबाद तालुक्यातील ७१ गावांतून सुभाष देशमुख यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. लोकसभा महायुतीने एकहाती जिंकली असली तरी विधानसभेची लढत वाटते तेवढी सोपी नाही एवढे मात्र नक्की.
निवडून गेलेले सर्व आमदार धोतरवाले
साहेबराव आबा हंगरकर, शिवाजीराव पाटील बाभळगावकर, माणिकराव भीमराव खपले, सिद्रामप्पा नागप्पा आलुरे, मधुकरराव देवराव चव्हाण.
२००९ च्या निवडणुकीत पडलेली मते्न
मधुकरराव चव्हाण : ६५,८०२
सुभाष देशमुख : ४९,४६९
देवानंद रोचकरी : ४५,९४२
अरविंद गोरे : १५,६६५
अर्जुन सलगर : ४९९९