वाढवणा परिसरात वृक्षतोड वाढली
By Admin | Updated: June 16, 2014 01:15 IST2014-06-16T00:38:34+5:302014-06-16T01:15:26+5:30
वाढवणा बु़ : बालाघाटच्या पायथ्याला असलेल्या परिसरासत वृक्षांची संख्या भरपूर आहे़ त्यात शासनाचे गायरानसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आहे़

वाढवणा परिसरात वृक्षतोड वाढली
वाढवणा बु़ : बालाघाटच्या पायथ्याला असलेल्या परिसरासत वृक्षांची संख्या भरपूर आहे़ त्यात शासनाचे गायरानसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आहे़ त्या गायरानावर बऱ्याच वर्षापूर्वी वनखात्याकडून वृक्ष लागवड केलेली आहे़ पण त्याकडे वनखाते हेतूपुरस्पर दुर्लक्ष करीत असल्यामुळे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे़
उदगीर तालुक्यातील वाढवणा बु़ खेर्डा, डावूळ, किनी, हिप्परगा, केसगीरवाडी, बेळसांगवी हे व इतर बरेच गाव बालाघाटच्या पायथ्याशी वसलेले गाव आहेत़ या भागामध्ये प्रत्येक गावाला मोठाले गायरान आहे़ विशेष करून किनी (यल्लादेवी) जवळच मल्लयअप्पाचे मोठे ३ डोंगरे असून, या डोंगरावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात शासनाने वृक्ष लागवड केली़ पण आज या गायरानावरील वृक्षांवर या भागातील व्यापारी दिवसाढवळ्या कुऱ्हाडी घालत आहेत़ वाढवणा व परिसरात जवळपास लाकडांचा व्यापार करणारे व्यापारी ३० ते ४० च्या घरात आहेत़ या व्यापाऱ्यांकडून वन विभागाने काही अधिकारी चेरीमेरी खाऊन त्यांच्या विनापरवाना वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करीत आहेत़ हे व्यापारी या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांचे फळांचे वृक्षसुद्धा विकत घेऊन त्याची रीतसर परवानगी न घेता सुद्धा तोड करून त्याची काळ्या बाजारात विक्री करीत आहेत़ सध्या हे व्यापारी आंबा, चिंच, जांभळी, बाभळी, कडू लिंबू एवढेच नाहीतर चंदनाच्या झाडांचीसुद्धा हे व्यापारी दिवसाढवळ्या तोड करीत आहेत़ वास्तिक पाहता शेतकऱ्यांच्या शेतातील झाड तोडण्यासाठी रीतसर परवानगी घ्यावे लागते़ पण ते शेतकरी तसे करीतच नाहीत़ हे व्यापारी त्यांच्याकडून कवडीमोल दरात वृक्ष घेतात आणि ते ४०० ते ५०० रूपये प्रति क्विंटल प्रमाणे विकतात़ याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर या भागातील वनराई नष्ट होईल़ याबाबत वनखात्याचे अधिकारी वंजे यांना विचारले असता त्यांनी या व्यापाऱ्यावर कार्यवाही करू, अशी ग्वाही दिली़(वार्ताहर)