जलपर्णी शोषतात विषारी घटक
By Admin | Updated: June 5, 2014 01:08 IST2014-06-05T00:57:08+5:302014-06-05T01:08:04+5:30
औरंगाबाद : औरंगाबादचे वैभव असलेल्या सलीम अली सरोवरात आसपासच्या रहिवासी वसाहतींमधील ड्रेनेजचे पाणी सोडले जात आहे.

जलपर्णी शोषतात विषारी घटक
औरंगाबाद : औरंगाबादचे वैभव असलेल्या सलीम अली सरोवरात आसपासच्या रहिवासी वसाहतींमधील ड्रेनेजचे पाणी सोडले जात आहे. मात्र, पाण्यातील प्रदूषण रोखण्यात महानगरपालिकेला यश आले नाही; पण हेच काम जलपर्णीने करून दाखविले आहे. एवढेच नव्हे तर येथील जैवविविधता जपण्यातही या जलपर्णीचा मोठा वाटा आहे. तरीसुद्धा या सरोवरातील अर्धी जलपर्णी काढून टाकण्यात आली आहे. येथील जलपर्णी कमी झाली, तर जैवविविधताही संकटात येऊ शकते. या पाणवनस्पतीत सांडपाण्यातील विषारी सेंद्रिय घटक शोषून घेण्याची प्रचंड क्षमता आहे. साल्व्हिनिया, लेम्ना, स्पायरोडेला यांचा वापर सांडपाण्यातील नायट्रोजन आणि फॉस्फरस शोषून घेण्यासाठी केला जातो. या पाणवनस्पतीला वाढवण्यासाठी तसे काही विशेष करावे लागत नाही. तिचा वाढीचा वेग प्रचंड असतो. विषारी रसायने शोषून घेण्याची त्यांची क्षमतासुद्धा प्रचंड असते. या पाणवनस्पतींच्या यादीत इकॉर्निया म्हणजे हायस्निळची गणना होते. सांडपाण्यातील नत्र, फॉस्फरस, सेंद्रिय कार्बन, तरंगणारे घनपदार्थ, फिनॉलसल्प कीटकनाशके, क्लोरिनयुक्त हायड्रोकार्बन, जड धातू या सर्व प्रकारच्या प्रदूषकांना शोषून घेण्याची क्षमता तिच्यात आहे. हे संस्कारित सांडपाणी वाहत्या पाण्यात किंवा जमिनीच्या पृष्ठभागावर सोडून त्याची विल्हेवाट लावता येते. जलपर्णीइतकी विषारी घटक शोषून घेण्याची क्षमता दुसर्या कोणत्याही वनस्पतीत नाही. हेच या जलपर्णीचे बलस्थान आहे. यासंदर्भात पक्षीप्रेमी डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले की, जलपर्णी फक्त सांडपाण्यावरच येत असते. गोड पाण्यात जलपर्णी कधीच येत नाही. मध्यंतरीच्या काळात महानगरपालिकेने सलीम अली सरोवरातील निम्मी जलपर्णी काढून टाकली. मात्र, या जलपर्णीवरच येथील जैवविविधता टिकून आहे याचे ज्ञानच त्यांना नाही. अजूनही येथे पाणी स्वच्छ दिसावे म्हणून जलपर्णी काढण्याचा विचार मनपा करीत आहे. मात्र, जलपर्णी काढल्यास आसपासच्या परिसरातून येणार्या ड्रेनेजच्या पाण्याने सरोवरात दुर्गंधी पसरेल. येथील जैवविविधता नष्ट होईल, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला. जलपर्णीवर पर्यावरणशास्त्रात अधिक संशोधन झाले पाहिजे आणि जिथे-जिथे तलाव आहेत तिथे जलपर्णीची संख्या वाढविली पाहिजे. जेणेकरून तलावातील पाणी प्रदूषणमुक्त होईल. ८२ पैकी ५६ प्रकारचे पक्षी देशी सलीम अली सरोवरात ८२ प्रकारचे पक्षी आहेत. त्यात ५६ प्रकारचे देशी तर उर्वरित विदेशी आहेत. विदेशी पक्षी हंगामातच येथे मुक्कामाला येत असतात. जलपर्णीमुळे येथे कीटक, जलचर प्राण्यांचे वास्तव्य असते. तेच या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे. जलपर्णीमुळेच आपणास आज येथे जैवविविधता बघावयास मिळत आहे. येथील जलपर्णी काढून टाकली, तर पाणी दूषित होईलच, याशिवाय सरोवरात दुर्गंधीही पसरेल. याचा परिणाम जैवविविधता नष्ट होण्यावरही होऊ शकतो.