भरधाव कंटेनरने चिरडल्याने बालिकेसह तिघांचा मृत्यू

By Admin | Updated: August 19, 2014 02:10 IST2014-08-19T01:17:10+5:302014-08-19T02:10:25+5:30

उस्मानाबाद : वाहनाची वाट पाहत रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसलेल्या भाविकांना कंटेनरने चिरडल्याने पाचवर्षीय चिमुरडीसह तिघांचा मृत्यू झाला़ तर अन्य दोघे गंभीर

Three people died after rubbing the container | भरधाव कंटेनरने चिरडल्याने बालिकेसह तिघांचा मृत्यू

भरधाव कंटेनरने चिरडल्याने बालिकेसह तिघांचा मृत्यू




उस्मानाबाद : वाहनाची वाट पाहत रस्त्याच्या कडेला झाडाखाली बसलेल्या भाविकांना कंटेनरने चिरडल्याने पाचवर्षीय चिमुरडीसह तिघांचा मृत्यू झाला़ तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून, एका महिलेला सोलापूर येथील रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे़ हा अपघात सोमवारी सायंकाळच्या सुमारास वडगाव सिध्देश्वर नजीक घडला़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्यातील चौथा सोमवार असल्याने उस्मानाबाद शहरातील साळुंके नगर परिसरात राहणाऱ्या जयश्री भागवत सुतार (वय-२६) यांच्यासह रोहिणी आनंद सुतार (वय-२२), ललिता राजेंद्र सुतार (पवार) (वय-४० दोघी रा़अपसिंगा ता़तुळजापूर), वैष्णवी विकास लोहार (वय-०५ रा़उमरगा), अंगदराव रामा माने (वय-८० रा़ शेळगाव ता़बार्शी) हे वडगाव (सिध्देश्वर) येथे दर्शनासाठी गेले होते़ सिध्देश्वराचे दर्शन घेवून परत उस्मानाबादकडे येण्यासाठी महादेव मंदिराकडे जाणाऱ्या पाटीजवळील वडाच्या झाडाखाली हे भाविक बसले होते. त्यावेळी तुळजापूरकडून उस्मानाबादच्या दिशेने आलेल्या कंटेनरने (क्ऱआऱजे़१८- जी़ए़७२३३) रस्त्याच्या खाली उतरून भाविकांना चिरडले़ या अपघातात अंगदराव रामा माने या वृध्द इसमाचा जागीच मृत्यू झाला़ तर उर्वरित भाविक गंभीर जखमी झाले़ यातील जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता ५ वर्षीय बालिका वैष्णवी लोहार हिचा मृत्यू झाला़ तर ललिता राजेंद्र सुतार (पवार) या गंभीर जखमी महिलेस पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रूग्णालयात पाठविण्यात आले़ दरम्यान, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. तर रोहिणी सुतार यांना सोलापूर येथील रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जयश्री सुतार यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. (प्रतिनिधी)



एकीकडे लहान वैष्णवी वडगाव येथे श्री सिध्देश्वराचे दर्शन घेण्यासाठी आली होती़ तर तिचे वडिल विकास लोहार, काका भागवत लोहार व आजी-आजोबा हे बालाजीच्या दर्शनासाठी तिरुपतीकडे जात होते़ ते हैद्राबादमध्ये असताना त्यांना अपघाताची माहिती नातेवाईकांकडून समजली. त्यानंतर ते तातडीने उमरग्याकडे परत निघाले. मात्र, परत निघताना वाहन लवकर मिळत नसल्याने त्यांची हेळसांड सुरू असल्याचे रूग्णालयातील नातेवाईकांनी सांगितले़


उस्मानाबाद-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वडगाव येथील सिध्देश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात घडल्यानंतर अपघातातील गंभीर तीन महिलांसह पाच वर्षाची चिमुरडी वैष्णवी ही बालिका रस्त्याच्या कडेला तडफडत पडली होती. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, मंदिरात आलेल्या हजारो भाविकांसह राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या एकाही व्यक्तीने जखमींना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला नाही़ अपघातानंतर जवळपास पाऊण ते एक तासानंतर शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणपत जाधव यांच्यासह त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून अपघातातील जखमींना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविले. परंतु, रूग्णालयात आल्यानंतर वैष्णवी हिचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांची वाट न पाहता उपस्थितांपैकी कुणीही पुढाकार घेऊन वैष्णवीला थोडेसे लवकर रूग्णालयात आणले असते तर तिचे प्राण वाचविता आले असते, असे डॉक्टरांनी सांगितले.


अपघाताची माहिती शहर पोलिस ठाण्यास मिळताच ठाणे अंमलदार मंजुळे यांनी सपोनि जाधव यांना माहिती दिली़ दहिहंडी कार्यक्रमात बंदोबस्ताला असलेले सपोनि गणपत जाधव, त्यांचे सहकारी जगताप, चालक भोसले, कंकाळ, भारती यांनी बायपास रोडवर कंटेनर ताब्यात घेतले. यावेळी चालक फरार झाला. तेथून तातडीने पोलिस घटनास्थळी गेले. पोलिसांनी एका घरातील कापड आणून मयताचे पार्थिव जिल्हा रूग्णालयात आणले़ तर जखमींनाही तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले़
४जिल्हा आरोग्य अधिकारी फुलारी यांनीही अपघाताची माहिती मिळताच जिल्हा रूग्णालयाकडे धाव घेतली़ एका गंभीर जखमी महिलेला सोलापूरकडे रेफर करण्यात आले होते़ तिस नेतेवेळी दुसरी महिला रोहिणी सुतार यांनाही सोलापूरला नेण्याचे डॉक्टरांनी सांगितले होते़ मात्र, एकाच महिलेला नेण्यात आले त्यानंतर रात्री फुलारी यांनी नातेवाईकांची भेट घेवून त्यांना रोहिणी सुतार यांना सोलापूरकडे नेण्यास सांगितले़ १०८ वर फोन लावून नातेवाईकांना वैद्यकीय अधिकारी असलेली अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली़


अपघातातील मयत वैष्णवी लोहार मागील दोन वर्षांपासून उस्मानाबादमधील साळुंकेनगर भागात मावशीकडे वास्तव्यास होती. वडिल उमरगा येथे प्रिंटींग प्रेसचे काम करतात़ त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे़ मोठी मुलगी भाग्यवंती तर दोन नंबरची वैष्णवी. सोमवारी सायंकाळी दर्शनासाठी आलेल्या वैष्णवीवर काळाने घाला घातला़ हे वृत्त उमरग्यात समजताच तिच्या आईने एकच टाहो फोडला.

Web Title: Three people died after rubbing the container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.