नागरिकांचा जीव धोक्यात

By Admin | Updated: July 27, 2014 01:15 IST2014-07-27T00:13:51+5:302014-07-27T01:15:32+5:30

जालना : शहरातील मियाँसाब दर्गा भागातील नव्यावस्तीत एकाच पोलवर सुमारे ३० ते ४० वीज जोडणी दिलेली आहे.

The threat of civilian life | नागरिकांचा जीव धोक्यात

नागरिकांचा जीव धोक्यात

जालना : शहरातील मियाँसाब दर्गा भागातील नव्यावस्तीत एकाच पोलवर सुमारे ३० ते ४० वीज जोडणी दिलेली आहे. गल्लीत खांब नसल्याने एका खांबावरुन वीज जोडणी घेण्यासाठी नागरिकांना केबल वायरला बांबू व लाकडाचा आधार द्यावा लागत आहे.
महावितरणकडे गल्लीत खांब टाकण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने या भागातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
जुना जालना भागातील मस्तगड परिसरात कुंडलिका नदीच्या काठावर प्राचीन मियाँसाब दर्गा आहे. या दर्गा परिसरात जुनी व नवीन अशा दोन वस्त्या आहेत. नवीन वस्त्यात एका गल्लीत सुमारे ३० ते ४० घरे आहेत. या घर मालकांनी महावितरण कडून नियमाप्रमाणे वीजजोडणी घेतलेली आहे. मात्र ही वीज जोडणी गल्लीच्या एका टोकावर असलेल्या एका खांबावरून देण्यात आली. गल्लीत स्वतंत्र असे खांब लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे एकाच खांबावरून ही वीज जोडणी केलेली आहे. खाबांपासून घरांचे अंतर जास्त असल्याने वीज जोडणी करणाऱ्याला जास्तीच्या केबल वायरसह ती घरापर्यंत घेण्यासाठी खांब ते घर दरम्यान बांबू व लांब लाकडाचा खर्च करावा लागला. बांबू व लाकडाच्या आधारावरच केबल घरापर्यंत आलेली आहे. सध्या पावसाळा असल्याने लाकडाचा आधार ढिल्ला होऊन केबल लोंबकळत आहे. केबलवायरसाठी अतिरिक्त खांब देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)
वर्षभरापासून पाठपुरावा तरीही खांब मिळेनात
या गल्लीत स्वतंत्र चार ते पाच खांब देण्यात यावे. त्यावरून संबंधितांना वीज जोडणी देण्यात यावी अशी मागणी या भागातील नागरीकांनी केलेली आहे. त्यासाठी मागील वर्षभरापासून महावितरण कडे नागरीक पाठपुरावा करीत आहेत.
या भागात एकाच पोलवरून सुमोरे १९ फुट ते ६०० फुटापर्यंत वायर बांबू व लाकडाच्या मदतीने ३० ते ४० ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली. त्यामुळे हे वायर खाली लोंबकळत आहेत. शॉर्टसर्कीट होण्याचाही धोका आहे. त्यामुळे नागरीकांचा जीव धोक्यात आलेला आहे. नागरीकांनी मागणी करून व कार्यालयात खेटे मारूनही संबंधीत अभियंता याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या भागातील नागरीकांनी केला आहे.

Web Title: The threat of civilian life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.