हजार, पाचशेच्या नोटा बंद केल्याने उडाली खळबळ
By Admin | Updated: November 9, 2016 01:42 IST2016-11-09T01:31:39+5:302016-11-09T01:42:46+5:30
पूर्वतयारी करणे आवश्यक होते काळा पैसा नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मात्र, ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद करताना बँकांमध्ये

हजार, पाचशेच्या नोटा बंद केल्याने उडाली खळबळ
पूर्वतयारी करणे आवश्यक होते
काळा पैसा नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मात्र, ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद करताना बँकांमध्ये १०० च्या नोटा मुबलक प्रमाणात ठेवणे आवश्यक होते. हजार,पाचशेच्या नोटा जमा करण्यासाठी बँकांमध्ये ग्राहकांच्या रांगा लागतील, पण १००, ५० रुपयांच्या नोटा तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होणे सध्या तरी अशक्य आहे. प्रॅक्टिकली मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात.
- देवीदास तुळजापूरकर, माजी संचालक, महाराष्ट्र बँक
टेबल खालून होणाऱ्या व्यवहारांना लगाम
काळा पैसा एकाच रात्री कसा संपवायचा, याचे उत्तम उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे. यामुळे ‘टेबल खालून ’ होणाऱ्या व्यवहारांना लगाम बसेल. तसेच काळा पैसा बाळगणाऱ्यांनाही या निर्णयाचा मोठा धक्का बसला आहे. यामुळे नकली नोटा बाजारात आणून हत्यारे खरेदी करणाऱ्या आतंकवाद्यांच्या आर्थिक नाड्या बंद होतील. याचा कॉर्पोरेट क्षेत्राला कोणतेही नुकसान नाही. तसेच जे बांधकाम व्यावसायिक किफायतशीर दरात थेट गरजू ग्राहकांना घरे विकतात त्यांनाही काहीच नुकसान नाही. मात्र,जिथे गुंतवणूक आहे. काळा पैसा आहे, खोटे काम आहे अशा लोकांना अडचणी येऊ शकतात.
देवानंद कोटगिरे, बांधकाम व्यावसायिक
अतिशय चांगला निर्णय
पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेला निर्णय अतिशय चांगला आहे. देशातील काळा पैसा यानिमित्ताने बाहेर येईल. ज्यांनी हजार व पाचशे रुपयांच्या नोटांचा साठा करून ठेवला आहे, तो साठा बाहेर काढताना त्यांना त्याचा अधिकृत हिशेब द्यावा लागेल. बेकायदेशीर सर्व व्यवहार ठप्प होतील.
-उपमहापौर प्रमोद राठोड
व्यवहारात अडचणी
५००, १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे व्यवहारात अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. नव्या नोटा येईपर्यंत १०० रुपयांच्या नोटांवर व्यवहार करणे अशक्य होईल. शंभरच्या नोटांमुळे मोठी रक्कम बाळगणे अवघड होईल.
-किशोर वाघमारे
काळ्या पैशाला बसेल खीळ
देशासमोर काळ्या पैशाचे संकट निर्माण झाले होते; परंतु प्रश्न सुटत नव्हता, अशा परिस्थितीत मोठ्या मूल्यांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचे व्यवहार होत असत, त्याला आता खीळ बसणार आहे. सद्य:स्थितीत काही ठराविक लोकांच्याच हाती पैसा खुळखुळत होता, तर मोठा घटक पैशापासून वंचित राहत होता. आता या वंचित घटकांनाही पैसे मिळतील.
- प्रा. डॉ. सर्जेराव ठोंबरे, अर्थतज्ज्ञ
रोखतेची समस्या होईल
पैशाची मागणी असताना पुरवठा न झाल्यास बाजारात पैशांची कमतरता निर्माण होईल. लोकांच्या हातात पैसा उपलब्ध झाला नाही तर वस्तूंची मागणी कमी होऊ शकते, यातून मंदीसारखी समस्या उद्भवेल. मात्र, सरकारच्या निर्णयामुळे समांतर अर्थव्यवस्था बनलेल्या काळ्या पैशाला लगाम बसेल. काळ्या पैशांसाठी हा धाडसी निर्णय आहे.
डॉ. आर. एस. सोळुंके, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ
मास्टर स्ट्रोक
अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. या काळात ज्यांनी आपली अघोषित संपत्ती जाहीर केली नाही त्यांच्याकडील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट ५०० व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आणून ‘मास्टर स्ट्रोक’ मारला. एकदम धाडसी निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे काळा पैसा बाळगणाऱ्यांना आता आपला पैसा पांढरा करण्यासाठी ‘पळवाट’ राहिली नाही. याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी.
- रेणुका देशपांडे, अध्यक्षा सीए असोसिएशन
ना भूतो ना भविष्यति निर्णय
५०० व हजार रुपयांच्या नोटा बंद करून पंतप्रधान मोदी यांनी ‘ना भूतो ना भविष्यति’ निर्णय घेतला आहे. ऐन उत्तरप्रदेशच्या निवडणुकीआधी हा निर्णय घेतला आहे. यामुळे अर्थकारणात हृदयविकाराचा झटका येईल. मात्र, काही दिवसांनंतर बायपास झाल्यावर ‘काळ्या पैशा’ला देशात थारा राहणार नाही. कोणी काळा पैसा बाळगणार नाही, तसेच काळा पैसा बाळणारे यातून सुटणार नाहीत. ज्यांचे नगदी व्यवहार आहेत त्यांना दैनंदिन व्यवहारात अडचणी येतील. मात्र, ज्यांचे पुस्तकी व्यवहार आहे त्यांना काही नुकसान होणार नाही.
- उमेश शर्मा, सीए