औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेच्या वेळी कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी दिला आहे. १५ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत, सुरळीत आणि निर्भयपणे पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी उपाययोजना आखण्यात आलेल्या आहेत. शहरात कोणत्याही ठिकाणी काही अनुचित प्रकार घडला, तर जास्तीत जास्त पाच मिनिटांच्या आत पोलीस तेथे पोहोचतील, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी सांगितले. नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, मतदान प्रक्रियेत जर कुणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
कायदा हातात घेणाऱ्यांची गय नाही
By admin | Updated: October 14, 2014 00:40 IST