‘ते’ वीज बिल भरण्याची गरज नाही
By Admin | Updated: December 12, 2014 00:55 IST2014-12-11T23:42:52+5:302014-12-12T00:55:41+5:30
औरंगाबाद : शहरातील वीज पुरवठ्याच्या हस्तांतरणानंतर जीटीएलकडे वीज बिल भरलेल्या वीज ग्राहकांना पुन्हा महावितरणकडे वीज बिल भरण्याची गरज नाही.

‘ते’ वीज बिल भरण्याची गरज नाही
औरंगाबाद : शहरातील वीज पुरवठ्याच्या हस्तांतरणानंतर जीटीएलकडे वीज बिल भरलेल्या वीज ग्राहकांना पुन्हा महावितरणकडे वीज बिल भरण्याची गरज नाही. ही माहिती महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता शंकर शिंदे यांनी दिली.
महावितरणने जीटीएलकडून शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेतला आहे. जीटीएलने वीजपुरवठ्याच्या हस्तांतरणानंतर काही मोठ्या वीज ग्राहकांचे (उद्योजकांचे) वीज बिल घेतले आहे. कंपनी ही माहिती महावितरणला देण्याची टाळाटाळ करीत आहे. हे वृत्त लोकमतने हॅलो औरंगाबादमध्ये प्रकाशित केले होते.
महावितरणने शहरातील वीज ग्राहकांकडून बिल वसुली मोहीम सुरू केली आहे. नागरिकांना बिल भरता यावे म्हणून पहिल्या टप्प्यात शहरात २२ ठिकाणी वीज बिल भरणा केंदे्र सुरू केली. काही उद्योजकांनी हस्तांतरणानंतर जीटीएलकडे बिल भरल्याची माहिती समोर आली. या मोठ्या ग्राहकांचे (उद्योजकांचे) चेक कंपनीने आपल्या खात्यावर जमा करून घेतले आहेत.
मुख्य कार्यकारी अभियंता शंकर शिंदे यांनी सांगितले की, जीटीएलकडे शहरातील काही उद्योजकांनी हस्तांतरणानंतर वीज बिल भरले होते. ती माहिती कंपनीकडून घेण्यात येत आहे. जीटीएलने ४९ लाख रुपये हस्तांतरणानंतर घेतले आहेत. ज्या उद्योजकांनी जीटीएलकडे वीज बिल भरले आहे, त्यांच्याकडून पुन्हा ते बिल वसूल करण्यात येणार नाही. कंपनीकडून लवकरात लवकर ही माहिती घेण्यात येईल.
उद्योजक आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये गुरुवारी वीज पुरवठ्याविषयी बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये उद्योजकांनी विजेच्या समस्या मांडल्या. यावेळी ग्राहकांनी थकीत वीज बिल महावितरणच्या वीज बिल भरणा केद्रांवर भरावे अथवा महावितरणच्या संकेत स्थळावर लवकर भरावे, असे आवाहन मुख्य अभियंता शिंदे यांनी केले.
३ वर्षांत १० हजार ग्राहकांनी बिल भरलेच नाही
औरंगाबाद : शहराचा वीजपुरवठा साडेतीन वर्षे जीटीएलकडे होता. त्यापैकी तीन वर्षांत शहरातील १० हजार ग्राहकांंनी वीज बिल भरलेलेच नाही, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे कंपनी काय करीत होती, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महावितरणने शहरातील वीजपुरवठा १५ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतला आहे. यावेळी शहरातील वीज ग्राहकांकडे १३४ कोटी रुपये वीज बिल थकलेले होते. हे वसूल करण्याचे आव्हान महावितरणसमोर आहे.
महावितरणने थकीत बिल वसुली मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षात ३० हजार ग्राहकांनी बिल भरले नाही. या ग्राहकांकडे १०० कोटींची थकबाकी आहे.
या ३० हजार ग्राहकांपैकी जवळपास १० हजार ग्राहकांनी तीन वर्षांपासून बिले भरली नाहीत. त्यांच्याकडे ५७ कोटी रुपये थकले आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे, असे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी सांगितले. मोहिमेत पहिल्या टप्प्यात २० दिवसांत साडेसहा हजार वीज ग्राहकांची जोडणी खंडित केली आहे. त्यापैकी २२०० ग्राहकांनी तात्काळ थकीत बिल भरले आहे. त्यांची वीज जोडणी करून देण्यात आली आहे.