जनतेचे प्रश्न विरोधकांनी मांडू नयेत, म्हणूनच अधिवेशन कालावधी कमी ठेवला: अंबादास दानवे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 18:27 IST2025-12-08T18:22:47+5:302025-12-08T18:27:22+5:30
शेकडो कोटी खर्च करायचे आणि ते चार आणि पाच दिवसांचे अधिवेशन करायचे?

जनतेचे प्रश्न विरोधकांनी मांडू नयेत, म्हणूनच अधिवेशन कालावधी कमी ठेवला: अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू झाले असतानाच, ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांनी अधिवेशनाच्या कालावधीवरून सत्ताधारी पक्षावर तीव्र टीका केली आहे. विदर्भावर अन्याय होऊ नये म्हणून नागपूर करार झाला असताना, अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवून जनतेचे प्रश्न दडपण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
अधिवेशन केवळ चार ते पाच दिवसांचे ठेवण्यावरून दानवे यांनी संताप व्यक्त केला. "मुख्यमंत्री स्वतः विदर्भाचे आहेत. विदर्भात होणारे अधिवेशन नागपूर करारामुळे झाले होते. विदर्भावर अन्याय होऊ नये, म्हणून ते वर्षातून एकदा व्हावे, असे ठरले होते. ते काय चार दिवसांचे व्हावे?" असा सवाल दानवे यांनी केला. "शेकडो कोटी खर्च करायचे आणि ते चार आणि पाच दिवसांचे अधिवेशन करायचे? पहिल्या दिवस तर श्रद्धांजली आणि बिल ठेवण्यातच जातो. उरले फक्त पाच दिवस."
जनतेचे प्रश्न दडपण्याचा प्रयत्न
दानवे यांनी थेट आरोप केला, "खरंतर जनतेचे प्रश्न विरोधकांनी मांडू नये, अशीच सरकारची इच्छा आहे आणि म्हणूनच अधिवेशन कसं गुंडाळता येईल, कसं कमी करता येईल, असा प्रयत्न सरकार करत आहे."
भास्कर जाधव विरोधी पक्षनेतेपदासाठी 'योग्य'
यावेळी अंबादास दानवे यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या चर्चेवरही स्पष्टीकरण दिले. "भास्कर जाधव कोणत्याही पदासाठी इकडे तिकडे जाणारा माणूस नाही," असे ठाम मत त्यांनी मांडले. उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ कार्यालयासाठी भास्कर जाधव यांचे नाव सुचवल्याचे त्यांनी स्पष्ट केले."उदय सामंत पदासाठी गेले आहेत," असा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे हे ११ आणि १२ तारखेला अधिवेशनात उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शेतकरी, कबुतर खाना आणि इतर मुद्दे
अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तसेच लोढा बिल्डरने आपल्या साइटवरील कबुतरखाना सुरू करावा, अशी मागणी दानवे यांनी यावेळी केली.