जनतेला फसवून सरकार सत्तेत आले, शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरणार: अंबादास दानवे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 19:13 IST2025-01-20T19:13:17+5:302025-01-20T19:13:35+5:30
पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करताना महायुतीतील घटक पक्षांमध्ये चर्चा झाली नाही, यामुळेच दोन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर ओढावली आहे.

जनतेला फसवून सरकार सत्तेत आले, शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरणार: अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर: महायुतीने निवडणूक काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. आता मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषयावर बोललो नसल्याचे सांगत आहेत. शेतकऱ्यांना फसवून हे सरकार सत्तेवर आल्याचा आरोप विधान परिषदेची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला.
आ. दानवे म्हणाले की, पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या करताना महायुतीतील घटक पक्षांमध्ये चर्चा झाली नाही, यामुळेच दोन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर ओढावली आहे. कारण या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांविरोधात महायुतीतील दुसरे मंत्री आणि त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन महायुतीने दिले होते. लाडक्या बहिणींनाही दरमहा २१००रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र सत्तेवर येताच लाडक्या बहिणींचे पैसे कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, शिवाय कृषीमंत्री दादा भुसे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा हे तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोललोच नसल्याचे म्हणत आहेत. जनतेला फसवून महायुतीत सत्तेत आल्याचा आरोप आ. दानवे यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याने ते दरेगाव येथे गेल्याचे बोलले जात आहे, याकडे लक्ष वेधले असता आ.दानवे म्हणाले की, एकनाथ शिंदे आता काहीही करू शकत नाही. कारण अडिच वर्षाच्या मुख्यमंत्रीपाच्या काळात शिंदे यांनी अनागोंदी कारभार केला. त्याचा सर्व रेकॉर्ड भाजपने सांभाळून ठेवला आहे. शिंदेसेना ही भाजपसाठीच काम करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना गांर्भियाने घेतली नाही
अभिनेता सैफ अली यांच्यावर हल्ला करणारा अवघ्या दोन दिवसांत पकडला जातो. दुसरीकडे मात्र मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांतील एक आरोपी अद्याप सापडला नाही. गांर्भियाने तपास केला असता तर चार दिवसांत सर्व आरोपींना अटक झाली असती, असे विरोधीपक्षनेते आ. दानवे म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती २३ जानेवारी रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने छत्रपती संभाजीनगर शिवसेना शाखेच्यावतीने रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, अन्नदान, तसेच अभिवादन असे विविध उपक्रम शहरातील विविध वॉर्डात आयोजित करण्यात आल्याचे आ. दानवे यांनी सांगितले.