आठ्ठरवाडीत स्मशानभूमीवरून तणाव
By Admin | Updated: August 9, 2014 00:28 IST2014-08-09T00:18:58+5:302014-08-09T00:28:47+5:30
पुसेगाव : हिंगोली तालुक्यातील आठ्ठरवाडी येथे स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने तणाव निर्माण

आठ्ठरवाडीत स्मशानभूमीवरून तणाव
पुसेगाव : हिंगोली तालुक्यातील आठ्ठरवाडी येथे स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने आणि आतापर्यंत ज्याठिकाणी अंत्यसंस्कार केले जायचे, त्याठिकाणी घरे बांधण्यात आल्याने ८ आॅगस्ट रोजी सकाळी एका ग्रामस्थाच्या निधनानंतर मोठा बाका प्रसंग निर्माण झाला. जागेच्या कारणावरून गावात काही काळ तणाव निर्माण झाल्याने तहसीलदार पोलिसांच्या फौजफाट्यासह गावात दाखल झाल्यानंतर हा प्रश्न सांमजस्याने सोडविण्यात आला.
आठ्ठरवाडी येथील शेतकरी निवृत्ती गोविंदा सिरामे, शेषराव गोविंदराव सिरामे व त्यांची मुले अनेक वर्र्षापासून गाव सोडून बाहेरगावी कामासाठी गेले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी सिरामे यांच्या मालकीच्या गट क्र.५०३ व ४८७ मधील शेताचा अंत्यविधीसाठी वापर सुरू केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी निवृत्ती व शेषराव सिरामे हे कुटुंबियांसह गावात राहण्यासाठी आले आहेत. त्याठिकाणी त्यांनी घर बांधून राहण्यास सुरूवात केली असून ‘आता या ठिकाणी अंत्यविधी करू नका’अशी ग्रामस्थांना विनंतीही केली. ८ आॅगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आठ्ठरवाडी येथील गणपतराव सटवाजी सिरामे (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी कुठे करायचा? हा प्रश्न निर्माण झाला. काही ग्रामस्थांनी गावालगतच्या गट क्र.५०३ व ४८७ मध्येच अंत्यविधी करण्याचा आग्रह धरला. त्यास निवृत्ती सिरामे व शेषराव सिरामे यांनी विरोध दर्शवल्याने गावात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे मंडळ अधिकारी एम. एस. खंदारे, तलाठी इनामदार व ग्रामसेवकाने याबाबत प्रशासनाला कळविले. त्यानुसार हिंगोलीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर, गटविकास अधिकारी डॉ. विशाल राठोड, नर्सी ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम बाचेवाड पोलिसांचा फौजफाटा घेऊन सकाळी ८ वाजता गावात दाखल झाले.
तहसीलदार कडवकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. आठ्ठरवाडीतील स्मशानभूमीची ग्रामपंचायतीकडे नमुना नं. ८ व सातबाराला नोंद नसल्याने शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी हिंगोलीच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे. परंतु त्याबाबत अद्याप कोणताही आदेश देण्यात आलेला नसल्याने पूर्वीप्रमाणे परंपरागत स्मशानभूमी असलेल्या जागेवर अंत्यविधी केला जावा, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. त्यावर तहसीलदार कडवकर यांनी पोलीस पाटील शालिकराम सिरामे, ग्रा. पं. सदस्य कानबाराव सिरामे, पंजाबराव कुरूंदे पाटील व ग्रामस्थांना समजावून सांगत हा वाइ मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जमिनीचे मूळ मालक असलेल्या सिरामे यांनी रस्त्याच्या पलीकडे आपल्या गट क्र.४३० मधील २ गुंठे जमीन स्मशानभुमीसाठी तत्काळ उपलब्ध करून दिली. त्यामुळे अखेर हा प्रश्न सुटला आणि शुक्रवारी दुपारी ३ वाजता त्याठिकाणी गणपतराव सिरामे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभुमीच्या वादामुळे आठ्ठरवाडीत शुक्रवारी दिवसभर तणावाची स्थिती होती.
बीडीओ राठोड यांनी स्मशानभुमीच्या नवीन जागेवर पंचायत समितीमार्फत शेड उपलब्ध करून दिले जाईल, असे ग्रामस्थांना सांगितले. तहसीलदारांच्या पुढाकाराने गावातील हा प्रश्न सोडविण्यात प्रशासनाला यश आले. (वार्ताहर)