दहा हजार क्विंटल हरभर्‍याचे शेतकर्‍यांना मिळेनात पैसे

By Admin | Updated: May 21, 2014 00:13 IST2014-05-20T23:49:23+5:302014-05-21T00:13:30+5:30

दिनेश गुळवे , बीड यावर्षी जिल्ह्यात नाफेडच्या वतीने तब्बल दहा हजार क्विंटल हरभर्‍याची खरेदी करण्यात आली आहे.

Ten thousand quintals of every one of the farmers get money | दहा हजार क्विंटल हरभर्‍याचे शेतकर्‍यांना मिळेनात पैसे

दहा हजार क्विंटल हरभर्‍याचे शेतकर्‍यांना मिळेनात पैसे

दिनेश गुळवे , बीड यावर्षी जिल्ह्यात नाफेडच्या वतीने तब्बल दहा हजार क्विंटल हरभर्‍याची खरेदी करण्यात आली आहे. यातील काही पैसे केवळ ‘चण्या-फुटाण्या’प्रमाणे देण्यात आले आहेत. हरभरा व तुरीच्या कोट्यवधी रुपयांपासून शेतकरी महिनोमहिने वंचित आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. गहू, ज्वारी, हरभरा, फळबागा, भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेक शेतकरी गारपीटीच्या अनुदानापासूनही वंचित असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे येत आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे शेतकर्‍यांनी घाम गाळून मिळविलेल्या पिकांचे पैसे मात्र शेतकर्‍यांना महिनोमहिने मिळत नाहीत. शेतकर्‍यांच्या मालाला योग्य किंमत मिळावी, शेतकर्‍यांची दलालासह इतरांकडून पिळवणूक होऊ नये म्हणून नाफेडच्या वतीने तूर, हरभरा, मका यांची हमीभावाने खरेदी करण्यात आली. तुरीची चार हजार तीनशे, हरभर्‍याची तीन हजार शंभर तर मकाची तेराशी रुपये प्रतीक्विंटलने खरेदी करण्यात आली. शेतकर्‍यांकडून खरेदी केलेल्या मालाचे पैसे चोवीस तासामध्ये देण्यासंदर्भात नियम आहे. हा नियम येथे डावलला जात नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील बीड, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई केज, धारूर, पाटोदा व कडा येथील खरेदी विक्री संघाच्या अनेक केंद्रावर शेतकर्‍यांनी हरभरा, तूर व मका घातलेली आहे. यातील मकाचे पैसे शेतकर्‍यांना मिळालेले आहेत. इतर पैसे मिळत नसल्याने शेतकर्‍यांना जिल्हा पणन अधिकार्‍यांच्या कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत. यावषीच्या हंगामात नोव्हेंबर ते ३१ मार्च दरम्यान विविध केंद्रावर तब्बल ९ हजार ४६० क्विंटल हरभर्‍याची खरेदी करण्यात आली होती. यापोटी शेतकर्‍यांना २ कोटी ९३ लाख २६ हजार रुपये मिळणार होते. आतापर्यंत मात्र केवळ ३१ लाखांवर शेतकर्‍यांची बोळवण करण्यात आली आहे. तब्बल पाच ते सहा महिन्यापासून अनेक शेतकर्‍यांचे पैसे मिळाले नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी सांगितले. हरभर्‍यासह तुरीचेही कोट्यवधी रुपये अद्याप शेतकर्‍यांना मिळालेले नाहीत. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी १८ हजार ६२ क्विंटल तूर नाफेडच्या खरेदी केंद्रावर घातलेली आहेत. यापोटी शेतकर्‍यांना ५ कोटी १६ लाख रुपये मिळाले आहेत. असे असले तरी अद्यापही २ कोटी ६० लाख रुपयांची शेतकर्‍यांना प्रतीक्षा आहे. खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकर्‍यांनी बियाणे, खत खरेदी, शेतीची मशागत सुरू केली आहे. शेतकर्‍यांना हक्काचे पैसे मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणी येत असल्याचे शेतकरी संघटनेचे मधुकर पवळ यांनी सांगितले. शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर पैसे थकल्याने ते पैसे तात्काळ देण्याची मागणी शेतकर्‍यांतून केली जात आहे. अधिकारीही हतबल हरभरा, तुरीची कोट्यवधी रुपये अद्यापही शेतकर्‍यांना मिळालेले नाहीत. यासंदर्भात जिल्हा पणन अधिकारी ए. एस. वारे म्हणाले की, पैशासाठी सातत्याने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. याउपरही मोठ्या प्रमाणावर पैसे मिळत नसल्याने त्यांनी हतबलता व्यक्त केली. गुत्तेदारांच्या पैशासाठी पाठपुरावा बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे हरभरा, तूर पिकाचे तब्बल ५ कोटी रुपये अनेक दिवसांपासून मिळत नाहीत. यासाठी एकही लोकप्रतिनिधी कधी विचारणा करीत नाही. उलट गुत्तेदारांच्या पैशासाठी विविध कार्यालयात लोकप्रतिनिधी फोन करतात वेळप्रसंगी स्वत: जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनेची मराठा प्रमुख कालिदास आपेट यांनी केला आहे. शेतकर्‍यांचे पैसे तात्काळ देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: Ten thousand quintals of every one of the farmers get money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.