दहा दिवसांत नऊ दुचाकी खाक
By Admin | Updated: December 28, 2014 01:25 IST2014-12-28T01:18:42+5:302014-12-28T01:25:35+5:30
वाळूज महानगर : बजाजनगरात दुचाकी जाळण्याचे सत्र नॉनस्टॉप सुरूच असून, आज मध्यरात्री पुन्हा तीन दुचाकी जाळल्यामुळे वाहनधारकांत खळबळ उडाली आहेत.

दहा दिवसांत नऊ दुचाकी खाक
वाळूज महानगर : बजाजनगरात दुचाकी जाळण्याचे सत्र नॉनस्टॉप सुरूच असून, आज मध्यरात्री पुन्हा तीन दुचाकी जाळल्यामुळे वाहनधारकांत खळबळ उडाली आहेत. दहा दिवसांत नऊ दुचाकी जाळल्यामुळे पोलीस प्रशासनाविषयी असंतोष व्यक्त होत आहे. वाहने जाळणाऱ्या माथेफिरूटोळीचा छडा लावण्यात स्थानिक पोलीस प्रशासन सतत अपयशी ठरत असल्यामुळे वाहने जाळण्याचे प्रकार बिनबोभाटपणे सुरूआहे.
बजाजनगर परिसरात तीन वर्षांपासून दुचाकी व चारचाकी वाहने जाळणाऱ्या माथेफिरू टोळीने धुमाकूळ घातला आहे. नागरिकांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी बेमालूमपणे पेटवून दिल्या जात असल्यामुळे वाहनधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज २७ डिसेंबरला वडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या छत्रपतीनगरातील संजय अंबादास वाघ यांची पल्सर दुचाकी क्र. (एम.एच.-२०, डी.एल.-२३११) व कैलास किसन पवार यांची पल्सर दुचाकी क्र. (एम.एच.-२०, डी.बी.-५८६०) या दोन दुचाकी अज्ञात माथेफिरूने पहाटे २.१५ वाजेच्या सुमारास पेटवून दिल्या. या दुचाकी जळत असताना स्फोटासारखा आवाज झाल्यामुळे शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुचाकी विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पर्यंत या दुचाकी पूर्णपणे जळाल्या होत्या. या आगीची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दुचाकी पेटविणाऱ्या माथेफिरूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
पोलीस पथक छत्रपतीनगरात असताना अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरानंतर सीमेन्स सोसायटीतील ज्ञानेश्वर बाबाजी विघ्ने यांची दुचाकी क्र.(एम.एच.-२०, डी.एम.-४०८०) कुणीतरी अज्ञात इसमाने आग लावली होती. दुचाकी जळत असताना आवाज झाल्यामुळे शेजारी राहणारे विजय जाधव यांनी मोबाईलद्वारे सय्यद मुन्शी यांच्याशी संपर्क साधून काहीतरी जळण्याचा वास येत असल्याचे सांगितले. यामुळे सय्यद मुन्शी, आफरिन सय्यद घराबाहेर आले असता त्यांना दोन दुचाकी जळत असल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे कॉलनीतील नागरिक मारुती इंगळे, संजय नातवणे, राजू जाधव मदतीसाठी धावले. यावेळी सय्यद मुन्शी यांची दुचाकी क्र. (एम. एच.-२०, ए.एल.-६३) हिला वाचविण्यात यश आले असून, या दुचाकीचे सिट तसेच इंडिकेटर जळाले आहे.
दरम्यान, या दुचाकीलगत असलेल्या ज्ञानेश्वर विघ्ने यांच्या नव्या दुचाकीचा पुरता कोळसा झाला आहे. याप्रकरणी संजय वाघ यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध तीन दुचाकी जाळल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास फौजदार जोंधळे करीत आहेत.
या आगीच्या घटनेत राहुल रमेश पाटील यांची (एम.एच.-२०, सी.डब्ल्यू-३२३९), गणेश माणिकराव डोरके यांची (एम.एच.-२०, बी.एम.९१६७) व सुहास भास्कर पाटील यांची (एम.एच.-२०, सी.डी.-३२८५) या तीन बजाजनगरातील कामगारांच्या दुचाकी व पंढरपुरातील फत्तू शहा या फळ विक्रेत्याची दुचाकी जळाली होती.
या दुचाकी जाळल्यानंतर माथेफिरूने याच ठिकाणी एक स्कूटी व एका दुचाकीवर पेट्रोल टाकून तिला आग लावण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, नागरिक मदतीसाठी धावल्याने या दुचाकींना आग न लावताच माथेफिरूपकडल्या जाण्याच्या भीतीने पसार झाले.