तूर तेजीत सोयाबीनचे दर घसरले
By Admin | Updated: August 7, 2014 23:30 IST2014-08-07T23:08:25+5:302014-08-07T23:30:10+5:30
हिंगोली : उत्पादकांच्या हातातून माल गेल्यानंतर भाववाढीची परंपरा यंदाही कायम राहिली.

तूर तेजीत सोयाबीनचे दर घसरले
हिंगोली : उत्पादकांच्या हातातून माल गेल्यानंतर भाववाढीची परंपरा यंदाही कायम राहिली. तुरीच्या बाबतीत गुरूवारी ही प्रचिती आल्याने क्विंटलामागे ४ हजार ८५० रूपयांचा कमाल भाव गेला; परंतु उत्पादकांपेक्षा व्यापाऱ्यांचाच माल अधिक असल्याने वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. दुसरीकडे सोयाबीनच्या भावात घट पाहवयास मिळाली.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मालाची आवक होते. वार्षिक उलाढालीमुळे पहिल्यापासून बाजार समिती ‘अ’ गटातमध्ये समाविष्ट आहे. हळद आणि सोयाबीनची वर्षभर खरेदी बाजार समितीत सुरू असते; परंतु गतवर्षी उत्पादनात घट झाल्याने प्रतिवर्षीप्रमाणे सोयाबीनची खरेदी-विक्री समितीत झाली नाही. हंगामाप्रमाणे सध्या भावातही घट झाली. बाजारात आवक नसतानाही ४ हजारांवर सोयाबीन घसरले. गुरूवारी सकाळी ३ हजार ४९० रूपयांपासून लिलावास सुरूवात झाली. मालाच्या दर्जानुसार त्यात वाढ होऊन कमाल दर ३ हजार ८३० वर पोहोचला. मागील पंधरवड्यात ४ हजार ३०० रूपयांपर्यंत सोयाबीनचा दर होता. तुरीची उलट स्थिती झाली असून संपूर्ण हंगामात सव्वाचार हजारांच्यावर न गेलेली तूर पाच हजारांजवळ पोहचली. गुरूवारी पहिल्यांदाच तुरीला ४ हजार ८५० रूपयांचा सर्वोच्च दर मिळाला. प्रारंभी ४ हजार ३१० रूपयांपासून लिलावास सुरूवात झाली. जिल्ह्यात गतवर्षी तुरीचे क्षेत्र केवळ ३२ हजार हेक्टर असल्यामुळे उत्पादन देखील कमी आहे. त्यातच आर्थिक चणचणीपायी लवकर उत्पादकांनी तुरीला बाजार दाखविली. त्यामुळे सध्या बाजार समितीत तुरीचे आवक कमी आहे. येणारी तूर शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्याचीच अधिक असल्याने व्यापाऱ्यांचीच चांदी होत आहे. (प्रतिनिधी)