कोट्यवधीच्या योजना राबविलेल्या गावांमध्येच टँकरद्वारे पाणी
By Admin | Updated: May 18, 2014 00:46 IST2014-05-18T00:34:15+5:302014-05-18T00:46:31+5:30
बीड: जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या बहुतांश पाणीपुरवठा योजना केवळ कागदावरच आहेत़

कोट्यवधीच्या योजना राबविलेल्या गावांमध्येच टँकरद्वारे पाणी
बीड: जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या बहुतांश पाणीपुरवठा योजना केवळ कागदावरच आहेत़ यामुळे यापुढे टंचाई भागाची संबंधित तहसीलदार व बिडीओ यांनी पहाणी करून जिल्हाधिकार्यांकडे अहवाल सादर करताच पाणीपुरवठा करण्यात येणार आहे़ यामुळे पाणीपुरवठा तात्काळ होण्यास मदत होणार आहे़ जिल्ह्यात आज स्थितीत ९३ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे़ यामध्ये ७४ टँकर खाजगी असून १९ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ सध्या उपलब्ध असलेली पाणीपुरवठा यंत्रणा बीड जिल्हयात अपुरी पडत असून आष्टी, शिरूर कासार, धारूर या तालुक्यातून टँकरची मागणी होत आहे़ जिल्ह्यातील नागरीकांची टँकर मागणी दिवसेंदिवस वाढत आहे़ विशेष म्हणजे जिल्हा परिषेतील पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यात कोट्यावधी रूपये खर्च करून पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबविलेल्या आहेत, परंतु अनेक योजना एकतर अर्धवट अवस्थेत आहेत़ नाहीतर पाणी पुरवठ्याच्या योजना केवळ कागदावरच आहेत़ यामुळे संबधीत गावांना योजना देऊन देखील पिण्यासाठी पाणी मिळत नाही़ ही वास्तविकता बीड जिल्ह्यात पहावयास मिळते़ यापूर्वी विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांनी देखील बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या पाणीपुरवठा योजनांच्या संदर्भात चिंता व्यक्त करून ग्रामीण भागातील नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावे़ अशा सुचना देखील संबधीत विभागाला दिल्या होत्या़ पाटोदा, शिरूर कासार, आष्टी व धारूर या तालुक्यांमध्या पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे़ यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाला जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचा अहवाल प्राप्त झाल्या शिवाय संबधीत गावाला टँकर देता येत नव्हते़ परंतु पाणीपुरवठा विभागाच्या बहुंताश योजनाचा गाशा गुंडाळलेला आहे तर ठिकठिकाणी अर्धवट अवस्थेत पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत़ यामुळे येथील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैलची पायपिठ करावी लागत आहे़ यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने संबधीत तालुक्यातील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी संबंधित गावांची पहाणी करून खरोखरच पाणी टंचाई असेल तर तात्काळ टँकरला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकार्यांनी सांगितले़ जिल्हाधिकारी करणार प्रत्यक्ष पहाणी जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर व अंबाजोगाई तालुक्यातील टंचाईगस्त गावांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे स्वत: भेट देणार आहेत़ याबरोबरच पाणीटंचाई असलेल्या गावांना तात्काळ पाणीपुरवठा करण्यासंबधी सुचना दिलेल्या असल्याचे राम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले़