आवडीच्या क्षेत्रातच शिक्षण घ्यावे
By Admin | Updated: June 1, 2014 00:26 IST2014-06-01T00:20:51+5:302014-06-01T00:26:40+5:30
लोकमत : एस्पायर एज्युकेशन फेअरचे थाटात उद्घाटन
आवडीच्या क्षेत्रातच शिक्षण घ्यावे
नांदेड : आवड असलेल्या क्षेत्रातच विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावे असा सल्ला पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांनी दिला़ लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ पंडित विद्यासागर होते़ पालकमंत्री सावंत म्हणाले, लोकमतने पत्रकारितेसोबतच सामाजिक बांधिलकी जपली आहे़ विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील संधीबद्दल लोकमतने सतत ४ वर्षांपासून माहिती उपलब्ध करून दिली आहे़ विशेष म्हणजे, लोकमत योग्यवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे़ आता १२ वीचा निकाल लागणार असून १२ वीनंतरच्या शैक्षणिक संधी विद्यार्थ्यांना कळणार आहेत़ लोकमतच्या या उपक्रमात आपणही गेल्या ४ वर्षांपासून सहभागी असून पुढील वर्षी मंत्री नसलो तरी शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचा सचिव म्हणून मी या उपक्रमात निश्चितपणे असेल, असेही सावंत यांनी स्पष्ट केले़ विद्यार्थ्यांनी आवड असलेल्या क्षेत्रात शिक्षण घ्यावे़ २१ व्या शतकातील ती गरज आहे़ काम करताना त्या क्षेत्रातील परिपूर्ण ज्ञान घ्यावे़ येणार्या काळात ज्ञानाचा वापर करून व्यवहार करणारेच यशस्वी होणार आहेत़ त्यासाठी व्यक्तिमत्व विकासाचीही गरज असल्याचे पालकमंत्री सावंत यांनी सांगितले़ अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ़ विद्यासागर यांनी शैक्षणिक क्षेत्रातील विविध संधीबाबत पालक सध्या गोंधळलेले असताना लोकमतचे हे प्रदर्शन विद्यार्थी व पालकांसाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले़ लोकमतच्या या शैक्षणिक प्रदर्शनीत पुणे, पंढरपूर आदी भागातील संस्था सहभागी झाल्या आहेत़ याचा अर्थ या भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता निश्चितच मोठी आहे़ असे शैक्षणिक उपक्रम हे वर्षभर टिकवणे ही बाबही आवश्यक असल्याचे ते म्हणाले़ ज्ञान हे केवळ शैक्षणिक संस्थेतच मिळते असे नाही तर बाहेर आल्यानंतरही ते घेत रहावे़ असे शैक्षणिक वातावरण तयार करण्याची गरज आहे़ त्यासाठी शैक्षणिक उपक्रम वाढविणे आवश्यक असून विद्यार्थी, पालकांचाही त्यात सहभाग आवश्यक आहे़ विद्यापीठही यासाठी प्रयत्न करीत आहे़ एक शिक्षक- एक कौशल्य आणि एक विद्यार्थी -अनेक कौशल्य ही योजना विद्यापीठांतर्गत राबविण्यात येत आहे़ समाजाच्या विकासासाठी सर्व प्रकारचे कौशल्य विकसित करावे लागतील, असेही कुलगुरू डॉ़ विद्यासागर यांनी स्पष्ट केले़ शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी आता खूप संधी उपलब्ध आहेत़ त्यांचा लाभ घेण्याची गरज आहे़ जागतिक पातळीवरही शैक्षणिक पॅटर्न बदलला आहे़ आता शिक्षणाचे आयाम बदलले असून कुठे शिकता याला महत्व नाही तर काय शिकता, याला महत्व आहे़ क्षमता वाढविल्यास जगातील कोणत्याही स्पर्धेत आपण टिकू शकता, असेही डॉ़ विद्यासागर यांनी स्पष्ट केले़ यावेळी अॅड़ संजय रूईकर यांनीही नांदेडमधील शैक्षणिक क्षेत्रातील संधीबाबत तसेच व्होराईजन डिस्कव्हरी अकॅडमी, रत्नेश्वरी इन्स्टिट्यूट आॅफ पॉलिटेक्निक आदी संस्थाबद्दल माहिती दिली़ मंचावर लोकमतचे सहायक सरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश यांची उपस्थिती होती़ प्रास्ताविकात लोकमतचे उपवृत्तसंपादक धर्मराज हल्लाळे यांनी लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअरच्या आयोजनाबाबतची भूमिका स्पष्ट केली़ सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सपना भागवत यांनी केले़ यावेळी पालक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते़