तहसीलदार, बीडीओ आज भेट देणार
By Admin | Updated: June 18, 2014 01:44 IST2014-06-17T22:49:40+5:302014-06-18T01:44:48+5:30
जालना : अंबड तालुक्यातील डोमलगाव येथे ग्रामस्थांनी आपल्यावर बहिष्कार टाकल्याचा आरोप मातंग समाजाने केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या गावात तातडीने समाजकल्याण उपायुक्तांमार्फत चौकशी केली.

तहसीलदार, बीडीओ आज भेट देणार
जालना : अंबड तालुक्यातील डोमलगाव येथे ग्रामस्थांनी आपल्यावर बहिष्कार टाकल्याचा आरोप मातंग समाजाने केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या गावात तातडीने समाजकल्याण उपायुक्तांमार्फत चौकशी केली. मंगळवारी दोन गटातील स्वतंत्र बैठक घेऊन वाद नियंत्रणात आणल्याचा दावा करण्यात आला आहे.
गावातील वाद जवळपास नियंत्रणात असून याबाबतचा अहवाल आपण जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार असल्याचे समाजकल्याण उपायुक्त बी.एन. वीर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. दरम्यान, अंबडचे तहसीलदार व गटविकास अधिकारी हेही बुधवारी डोमलगाव येथे भेट देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
९ जून रोजी गावात मातंग समाजातील एका बारा वर्षीय मुलीचा विनयभंग झाला होता. याच घटनेमुळे गावात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली. सदर घटनेतील आरोपीस पोलिसांनी अटक केली. सध्या आरोपी पोलिस कोठडीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र या प्रकरणानंतर गावात सामाजिक तेढ निर्माण झाले. मातंग मुक्ती सेनेचे नेते अशोक साबळे यांनी सोमवारी जालन्यात पत्रकार परिषदेत डोमलगाव येथे ग्रामस्थांनी मातंग समाजावर बहिष्कार टाकल्याचा आरोप करून प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या गावाचा संयुक्त दौरा करण्याची मागणी केली होती.
यासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी गावातील परिस्थितीचा अंदाज घेऊन चौकशीसाठी समाजकल्याण उपायुक्त बी.एन. वीर यांना पाठविले होते. वीर यांनी गावातील काही मंडळींच्या स्वतंत्र बैठका घेऊन सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)
अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ - साबळे
जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मातंग समाजावरील अन्याय, अत्याचारात वाढ झाली असून प्रशासनाकडून आरोपींविरुद्ध ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप मातंग मुक्ती सेनेचे नेते अशोक साबळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. नानेगाव येथे सरपंच मनोज कसाब यांचा खून झाला. येणोरा येथे कलाबाई लक्ष्मण थोरात या महिलेचे घर गावगुंडांनी जाळले, दाई अंतरवाली येथे समाजातील एका मुलीवर बलात्कार झाला. डोमलगाव येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. यातील तीन घटना पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात घडल्या, असा आरोपही साबळे यांनी केला.
या अन्याय, अत्याचाराविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा साबळे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन समाजकल्याण उपायुक्तांकडे सादर करण्यात आले.