छत्रपती संभाजीनगर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चोर सोडून संन्याशांना त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याची भावना बळावल्यामुळे अनेक कर्मचारी-अधिकारी कामावरच येत नसल्याचे चित्र आहे. अपर तहसीलदार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कामावर येत नाहीत. निलंबित केले तरी चालेल, परंतु चौकशीचा ससेमिरा मागे नको, अशी भूमिका अनेकांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
निलंबित अपर तहसीलदार नितीन गर्जे एक महिन्यापासून पोलिसांना सापडत नसल्यामुळे संशयकल्लोळ वाढला आहे. १५ मे रोजी एसीबीची कारवाई झाली होती. गर्जेसाठी पैसे घेताना नितीन चव्हाण व अन्य एक जण अडकला होता. त्यानंतर २७ मे रोजी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिराेळकर बडी रक्कम घेताना पकडला. दिलीप त्रिभुवन हा लिपिकही सोबत अडकला. २४ रोजी पुरवठा निरीक्षण अधिकारी कांचन कांबळे सापळ्यात अडकली.
कर्मचारी काय सांगतात?गर्जे पसार आहे, त्यात आम्हाला काही माहिती नाही. ज्यांचा संबंध नाही. त्यांना देखील एसीबीचे अधिकारी धाक दाखवित आहेत. गेल्या महिन्यात चौकशीमुळे एका अधिकाऱ्याचा रक्तदाब वाढल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. दोन कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येणे बंद केल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. लाच प्रकरणात कुणी अडकले की थेट वरिष्ठांसाठी रक्कम घेत असल्याचे लाचखोर सांगतात. परंतु त्यात किती तथ्य आहे, याची शहानिशा होण्यापूर्वीच एसीबीकडून संबंधितांच्या चौकशीचे सत्र सुरू होते. वरिष्ठ आणि लाच घेणारा यांच्यात कधी बोलणे का, लेखी काही पुरावा आहे काय, एसएमएस चॅटींग, मध्यस्थ कुणी होता की नव्हता. या बाबी समोर आणण्यासाठी एसीबीकडून चौकशी होत आहे.
खिरोळकर प्रकरणात पुढे काय?निलंबित निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरच्या प्रकरणात एसीबीने त्या विभागातील संबंधितांची चौकशी का केली नाही, अशी चर्चा प्रशासनात आहे. तसेच त्याचा पंटर के. एम. कोण आहे, त्याला ताब्यात घेऊन विचारणा का केली नाही?, किती प्रकरणे खिरोळकरने मंजूर केली?, ती कुणाची होती? याची चौकशी सध्या सुरू आहे. चौकशीअंती वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये किती जमिनीची प्रकरणे मंजूर झाली, हे समजेल. शहरातील एका उद्योजकाची संचिका मंजूर करण्यासाठी मोठा व्यवहार झाला होता. परंतु, लाच प्रकरण घडल्यामुळे तो व्यवहार अर्धवट राहिल्याची चर्चा आहे.