औरंगाबाद-अहमदनगर-पुणे रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST2020-11-12T07:28:50+5:302020-11-12T07:28:50+5:30
औरंगाबाद : महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लि. (एमआरआयडीसी)कडून औरंगाबाद- अहमदनगर- पुणे रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षण पूर्ण ...

औरंगाबाद-अहमदनगर-पुणे रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण सुरू
औरंगाबाद : महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लि. (एमआरआयडीसी)कडून औरंगाबाद- अहमदनगर- पुणे रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यांनंतर त्याचा डीपीआर मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाला सादर केला जाणार आहे.
औरंगाबाद- अहमदनगर- पुणे मार्गासह औरंगाबाद- दौलताबाद-चाळीसगाव आणि रोटेगाव- कोपरगाव मार्गाचेही सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर या दोन मार्गाचाही डीपीआर तयार करून मंजुरीसाठी रेल्वे बोर्ड आणि महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर यांना एमआरआयडीसीने एका पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. रोटेगाव- कोपरगाव या मार्गाची गेल्या २५ वर्षांपासून प्रतीक्षा केली जात आहे. पूर्वी रोटेगाव- पुणतांबा या मार्गाची मागणी केली जात होती; परंतु या मार्गात गोदावरी नदी येते. त्यामुळे रोटेगाव- कोपरगाव अशा ३५ कि.मी. मार्गाचा पर्याय मांडण्यात आला. त्यास मंजुरीही मिळाली; परंतु हा मार्ग सर्वेक्षणाच्या पुढे जात नाही. औरंगाबाद-चाळीसगाव मार्गाचीही नुसती प्रतीक्षा करावी लागत आहे.
पुण्याचा प्रवास होणार कमी वेळेत
औरंगाबाद- पुणे रेल्वेमार्ग झाल्यास कमी वेळेत प्रवास करणे शक्य होईल. सर्वेक्षणातच हा मार्ग शक्य आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे. औरंगाबादहून पुण्याला शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे; परंतु प्रत्यक्ष हा मार्ग होण्यासाठी किती वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.