समूहशेतीला मिळणार पाठबळ!
By Admin | Updated: May 28, 2014 00:24 IST2014-05-27T23:52:52+5:302014-05-28T00:24:54+5:30
जालना : शेतकर्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे, शेतीपूरक व्यवसाय उभारणे या माध्यमातून शेतकर्यांचा आर्थिक स्तर ऊंचावण्यासाठी समूह शेतीच्या योजनेस पाठबळ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

समूहशेतीला मिळणार पाठबळ!
जालना : शेतकर्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळवून देणे, शेतीपूरक व्यवसाय उभारणे या माध्यमातून शेतकर्यांचा आर्थिक स्तर ऊंचावण्यासाठी समूह शेतीच्या योजनेस पाठबळ देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. शेतकर्यांची कमी होणारी जमीन, शेतीसाठी भांडवल पुरवठा करताना येणार्या तांत्रिक अडचणी, जमिनीची कमी होत असलेली उत्पादकता तसेच कृषी विस्तारास असलेल्या मर्यादा आदी बाबींचा विचार करून गट शेतीस चालना देणे क्रमप्राप्त ठरले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा एकत्रित अवलंब करुन उत्पादन वाढीचा प्रयत्न करणे, उत्पादित मालाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी शेतमाल विक्रीची सामूहिक व्यवस्था ही गरज बनत चालली आहे. बाजारपेठेतील स्पर्धात्मक वातावरणांचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर शेतकर्यांचे संघटन करुन व आदर्श शेती पध्दतीचा वापर करुन उत्पादन व विक्री व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने शेतकर्यांच्या समूह/गट शेतीस चालना देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. शेतकर्यांचा गट तयार करुन समूह शेती ही योजना आगामी काळात राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत कृषी विस्तारामार्फत आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकर्यांना एकत्रित गटाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देता येणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक प्रश्नांची माहिती घेऊन शेतकर्यांचे वैयक्तिक प्रश्नसुध्दा सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. गटातील शेतकर्यांशी मोबाईलव्दारे संपर्क साधून हवामान, पीक उत्पादन, तंत्रज्ञान, कीड व रोग सर्वेक्षण आदींबाबत माहिती देण्यात येणार आहे. शेतकरी एकत्र आल्यामुळे त्यांचे संघटन होऊन गटामार्फत प्राथमिक प्रक्रिया विक्री यामध्ये शेतकरी सहभाग घेऊन अधिकाधिक उत्पन्न मिळण्यासाठी सहकार्य करतील. या देण्याची योजनेची अंमलबजावणी २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये करण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी संचालक (आत्मा) यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असे निर्देश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. दरम्यान, या योजनेत जिल्ह्यातील शेतकर्यांनी सहभाग नोंदविल्यास त्यांना निश्चितच फायदा मिळू शकतो. विशेषत: शेतीसाठी पाणी आणि उत्पादित मालाला जास्त भाव मिळेल, अशी आशा कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी) शेतीवर आधारित व शेतीपूरक उद्योगांना चालना देणे आणि त्या माध्यमातून शोतकर्यांनी उत्पादित केलेल्या मालास जास्तीत जास्त भाव मिळवून देणे, शेतकर्यांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर ऊंचावणे यासाठी समूह शेतीची योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकर्यांना हवामान, पीक, उत्पादन, मालाचा बाजार भाव आदी माहिती मोबाईलव्दारे समूह सदस्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. सन २०१४-१५ या वर्षात शेतकर्यांच्या समूह/गट शेतीस चालना देण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्यास ५०.०० लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आली आहे. या रकमेतून योजनेच्या जनजागृतीसह अंमलबजावणीसाठी विविध माध्यमांतून प्रयत्न करण्यात येणार आहे. ही योजना राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली.