निवडणुकीत अंधश्रद्धा जोरात
By Admin | Updated: April 21, 2015 00:53 IST2015-04-21T00:53:42+5:302015-04-21T00:53:42+5:30
औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सायंकाळी ५ वा. संपली असली तरी आता अंधश्रद्धाळू राजकारण्यांची जादू आणि छुमंतर करून मतदारांना भुलविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे

निवडणुकीत अंधश्रद्धा जोरात
औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सायंकाळी ५ वा. संपली असली तरी आता अंधश्रद्धाळू राजकारण्यांची जादू आणि छुमंतर करून मतदारांना भुलविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बाहेरील राज्यातील मांत्रिकांना बोलावून वॉर्डांची सीमा बांधणे, तसेच वॉर्डा-वॉर्डांतील धार्मिक स्थळांसमोर हवन करणे, वॉर्डात लिंबू व काळी बाहुली उतरवून फेकण्यासारखे प्रकार आता घडू लागले आहेत. आज दिवसभर समर्थनगर, किराडपुरा, पुंडलिकनगर, गजानननगर, गुलमंडी, बाळकृष्णनगर या वॉर्डांत अंधश्रद्धाळूपणाचे वेगवेगळे प्रकार पाहावयास मिळाले. गायी बांधण्यापासून प्रचार कार्यालयात गंडे-दोरे लावणारे उमेदवार या निवडणुकीत पाहावयास मिळाले. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची पायमल्ली निवडणुकीत झाली आहे.
निवडणुकीच्या काळात वेध भविष्याचा, असा जाहीरनामा सादर करणाऱ्या राजकीय पक्षांनीच वेगवेगळे छा...छू...चे प्रयोग करून मतदारांना भुलविण्यात आघाडी घेतली आहे. समर्थनगरमध्ये दोन महाराज पांढरी मोहरी गल्लीबोळांमध्ये फेकत होते. ते कुणासाठी मंत्र भारून ती मोहरी फेकत होते, हे कळू शकले नाही; परंतु प्रचंड मताधिक्य मिळावे, यासाठी मतदारांना केंद्रावर जाताच एकच निशाणी दिसावी, त्या अनुषंगाने मोहरी फेकली जात असल्याचे त्या महाराजांमागे फिरणाऱ्या एका कार्यकर्त्याने सांगितले. ज्यांचा विश्वास अशा पद्धतींवर आहे, ते मनपात निवडून आल्यानंतर या शहराच्या विकासाचा महामार्ग कसा शोधणार, असा प्रश्न आहे.
एका राजकीय पक्षाच्या प्रचार कार्यालयात तर मोठी काळी बाहुली टांगण्यात आली आहे. पक्षाच्या लोकप्रियतेला कुणाची नजर लागू नये, यासाठी ती बाहुली टांगण्यात आली; परंतु झाले उलटेच. पक्षाला पक्षातील बंडखोरांनीच टांगणीला लावले आहे. कपाळाला गंध कोणता लावायचा, कपडे कोणते घालायचे, मतदारांना कसे बोलायचे, गायीला रोज कोणता नैवेद्य द्यायचा, गल्लीतून जाताना अमुकच दिशेने भस्म फेकायचे, असे अनेक प्रकार या निवडणुकीत पाहावयास मिळाले.
बाळकृष्णनगर, समर्थनगर, गुलमंडी वॉर्ड डेंजर झोनमध्ये आहेत. असा प्रश्न एका पक्षाच्या नेत्याला केला असता त्या नेत्याने गमतीदार उत्तर दिले.
माझ्याकडे जादूची पुडी आहे. त्या पुडीतील भस्म सगळीकडे पेरले की, माझ्या मर्जीतील सर्व उमेदवार निवडून येतील, असे ते म्हणाले बंडखोरांमुळे सर्व राजकीय पक्षांची पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे जादूटोण्याचा वापर होत असल्याचे दिसते.