कामात हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई
By Admin | Updated: January 9, 2015 00:49 IST2015-01-09T00:25:16+5:302015-01-09T00:49:50+5:30
घनसावंगी : दुष्काळ निवारणाच्या कामात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखविल्यास त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.

कामात हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई
घनसावंगी : दुष्काळ निवारणाच्या कामात अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा दाखविल्यास त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.
येथील तहसील कार्यालयात गुरुवारी पालकमंत्री लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. आ. राजेश टोपे, माजी आ. विलास खरात, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, तहसीलदार अभय चव्हाण, गटविकास अधिकारी डॉ. ठोंबरे, संजय तौर, राहुल लोणीकर, फैय्याज पठाण यांच्यासह अन्य उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात या बैठकीत वादळी चर्चा झाली. काही सदस्यांनी पाणी पुरवठ्याबाबत गंभीर स्वरुपाच्या तक्रारी केल्या. त्यासंदर्भात पंचायत समितीसह पाटबंधारे खात्याचे अधिकारी समाधानकारक उत्तरे देवू शकले नाही. त्यामुळे पालकमंत्री कमालीचे संतप्त झाले होते. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारी करुन बैठकांना उपस्थित राहिले पाहिजे, असा सुनावून पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना अक्षरश: धारेवर धरले. पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी चुकीची माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालकमंत्री लोणीकर यांनी त्यांना कठोर शब्दात समज दिली. चुकीची उत्तरे दिल्यास यापुढे निलंबीत केले जाईल, असाही इशारा दिला.
अधिकाऱ्यांनी दुष्काळी कामात गांभीर्याने लक्ष केंद्रित करावे. बैठकांना हजेरी लावावी, अधिकाऱ्यांनी प्रतिनिधी वगैरे बैठकांना पाठवू नयेत, स्वत: उपस्थित राहावे, अन्यथा त्यांच्याविरोधातही वेतन कपातीचे आदेश काढले जातील, असा इशारा दिला.
यावेळी दुष्काळी उपाय योजनांच्या कामात अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवावी, असे ते म्हणाले. सर्वसामान्यांच्या व्यथांची दखल घेतली जाईल, अशी ग्वाही दिली.
जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचा घनसावंगीत सर्वपक्षीय नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी माजी आ. विलासराव खरात, हिकमतराव उढाण, संजय तौर, दिलीप तौर, राहुल लोणीकर, शाम उढाण, सुनील आर्दड, किरण खरात, दत्ता सुरोसे, रविंद्र तौर आदि उपस्थित होते.
४ यावेळी पालकमंत्री लोणीकर यांनी आपण या जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबध्द राहू, अशी ग्वाही दिली. सर्वसामान्य कुटुंबातून आपण आलो आहोत. परिस्थितीअभावी पुरेसे शिक्षण सुद्धा घेऊ शकलो नाही. परंतु ग्रामीण भागाची नाळ कधी तोडली नाही. ३२ वर्षांपासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत राहिलो असून आता संधी मिळाल्याने संपूर्ण राज्यास स्वच्छ पाणी पुरवठा करण्यास कटिबध्द राहु, अशी ग्वाही दिली. यावेळी हिकमतराव उढाण, विलास खरात, दिलीप तौर, संजय तौर व राहुल लोणीकर यांची भाषणे झाली. यावेळी गणेशनंदजी महाराज, श्रीकृष्ण पुरी महाराज, दिव्यानंद महामंडलेश्वर महाराज यांच्यासह पंढरीनाथ उगले, विष्णू जाधव, देवनाथ जाधव, अंकुश बोबडे, शैलेश पवार, औदुंबर बागडे, अॅड. शिवतारे, फैय्याज पठाण, किरण खरात, दिगंबर आर्दड, अरविंद घोगरे, विष्णू जाधव आदी उपस्थित होते.