बंजारा समाजाचा तालखेड फाट्यावर रास्ता रोको

By Admin | Updated: August 7, 2014 23:33 IST2014-08-07T23:11:52+5:302014-08-07T23:33:11+5:30

तालखेडफाटा येथे बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.

Stop the road to Banjara Samaj's Taqdhed fate | बंजारा समाजाचा तालखेड फाट्यावर रास्ता रोको

बंजारा समाजाचा तालखेड फाट्यावर रास्ता रोको

माजलगाव: गेल्या अनेक महिन्यांपासून बंजारा समाजाच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याच्या निषेधार्थ माजलगाव तालुक्यातील तालखेडफाटा येथे बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. यामुळे बऱ्याच वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
बंजारा समाजाच्या मागण्यांकडे महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश करावा, ही मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र यावर शासनाने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. यामुळे बंजारा समाजावर एक प्रकारे अन्याय होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केल्यास त्यांची आर्थिक प्रगती तर होईलच शिवाय ते समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील. अनेक भागामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश केल्यास त्यांना नोकरीसारखे सक्षम साधन मिळेल. त्यामुळे एसटी प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश करणे काळाची गरज बनली असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
तांडा सुधार योजनेसाठी पैसे द्यावेत
अनेक ठिकाणी बंजारा समाजाचे तांडे आहेत. तेथे राहणाऱ्या लोकांना दैनंदिन जीवनात विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक तांड्यावर रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अशा परिस्थितीत बंजारा समाजाचे नागरिक रहात आहेत. त्यामुळे तांडा सुधार योजनेसाठी दरवर्षी पाचशे कोटींचा निधी दिला पाहिजे तरच तांड्यांची सुधारणा होईल. त्या ठिकाणी नळ, रस्ते यासह अनेक सुविधा पोहचतील.
तांडा, वाड्यांना
ग्रामपंचायतचा दर्जा द्यावा
तांडा, वाड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाच्या लोकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तांडा वस्ती सुधार योजनेसाठी निधी तर द्यावाच यासह तांडा व वाड्यांना ग्रामपंचायतचा दर्जा द्यावा, त्यामुळे तेथे विविध योजना राबविल्या जातील. बेरोजगार लोकांच्या हाताला काम मिळेल. त्यामुळे तांडा, वाड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा देणे आवश्यक आहे. असे झाले तरच त्यांचे दैनंदिन प्रश्न मार्गी लागतील.
या मागण्यांसह विद्यार्थ्यांसाठीची नॉन क्रिमिलियरची अट रद्द करावी आदी मागण्या मांडण्यात आल्या. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. तालखेडफाट्यावर रास्ता रोको केल्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. दिगांबर राठोड यांनी केले. आंदोलनात तुकाराम चव्हाण, नवनाथ पवार, श्रीराम राठोड, विलास पवार, अजय चव्हाण, सुभाष पवार, माणिक पवार, गगन जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Stop the road to Banjara Samaj's Taqdhed fate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.