खोळंबलेल्या पेरण्या जोमाने सुरू

By Admin | Updated: July 25, 2014 00:30 IST2014-07-24T23:35:25+5:302014-07-25T00:30:29+5:30

जालना : गेल्या दोन दिवस पडलेल्या भिज पावसामुळेच जिल्ह्यात सर्वदूर खोळंबलेल्या खरिपाच्या पेरण्यांना मोठा वेग येईल, अशी चिन्हे आहेत.

Start the abandoned sowing | खोळंबलेल्या पेरण्या जोमाने सुरू

खोळंबलेल्या पेरण्या जोमाने सुरू

जालना : गेल्या दोन दिवस पडलेल्या भिज पावसामुळेच जिल्ह्यात सर्वदूर खोळंबलेल्या खरिपाच्या पेरण्यांना मोठा वेग येईल, अशी चिन्हे आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारपर्यंत २९ टक्के खरीप पेरण्यापूर्ण झाल्या होत्या. आता हे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत पोहचेल असा अंदाज आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून पावसाअभावी पेरण्या पूर्णत: खोळंबल्या होत्या. सर्वदूर शेतकरी चिंतेत होते. विशेषत: पावसा संदर्भात चिन्हे सुद्धा दिसत नसल्यामुळेच शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र गेल्या दोन चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर ढगाळ वातावरणासह हवेत गारवा पसरल्या पार्श्वभूमीवरच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु झाला.
मंगळवार, बुधवारी दोन दिवस सर्वदूर भिज पाऊस झाला. त्यामुळे सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. विशेषत: ठिबकवर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आनंदाचे वातावरण पसरले आहे. दुबार पेरणीचे संकट दूर झाल्यामुळेच चिंतेचे नाहीसे झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात आता खोळंबलेल्या पेरण्यांना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे.
ठिक ठिकाणी कपाशीची लागवड जोमाने सुरु आहे. मूग आणि उडिद ही पिके गेल्यात जमा आहे. त्याचे क्षेत्रसुद्धा लक्षणीय घटले आहे. कापूस आणि सोयाबीन या पिकांवरच मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. काही ठिकाणी तूर, मका आणि बाजरी याहीकडे शेतकरी वळाल असून, कापसाऐवजी या पिकांचा शेतकऱ्यांनी पर्याय म्हणून मार्ग स्वीकारला आहे.
जिल्ह्यात ओलिताखाली ऊस,कापूस,सोयाबीन व मूग या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली होती.
परंतु विहीर आणि बोअरवेलची पाणी पातळी घसरल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मंगळवारी रात्रीपासूनच्या भिजपावसामुळे शेतकऱ्यांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे ओलिताखाली पिके बहरणार असे चित्र आहे. यामुळे शेतकरी काही अंशी समाधानी झाला आहे.
संपूर्ण जिल्ह्यात येत्या आठ दिवसात खरिपाच्या पेरण्या पूर्ण होतील अशी चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)
सोयाबीनच्या क्षेत्रात तिप्पट वाढ
या जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढेल अशी चिन्हे आहेत. मूग व उडीद ही दोन्ही पिके गेल्याच्या पार्श्वभूमीवरच सोयाबीनवरच शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंठा तालुका होय. या परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीनला मोठी पसंती दिली. सरासरीच्या क्षेत्राच्या तिप्पट सोयाबीनची पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी डी.एस. बरधे यांनी दिली. या तालुक्यात सोमवार अखेर प्रत्यक्षात १८ हजार ५८६ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. तालुक्यात गेल्या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र ६३५० हेक्टर एवढे होते. या आकडेवारीवरुन यंदा सोयाबीनचा पेरा २९३ टक्के म्हणजे तीन पट वाढला असल्याचे चित्र समोर आले आहे.
दाट पेरणीचा सल्ला
गेल्या दीड महिन्यांपासून खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. त्या पेरण्यांना आता दोन दिवसांतील भीज पावसामुळे वेग आला आहे. येत्या चार सहा दिवसांत खरिपाच्या पेरण्या पूर्ण होतील असा अंदाज आहे. सध्या खरिपाची पेरणी करीत असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीस उशीर झाल्याने जास्तीचे बियाणे वापरुन दाट पेरणी करावी. तसेच ठिबकवरच कापसाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी कापाशीची लाल पाने दिसत असतील तर बुरशीनाशकाचा वापर करावा, असा सल्ला जिल्हा कृषी विभागाने दिला आहे.
दोन दिवस भिज पाऊस
मंगळवार व बुधवार हे दोन दिवस शेतकऱ्यांच्या दृष्टिने सुखावह ठरले आहेत. रिमझिम, हलक्या ते मध्यम पावसाने सर्वदूर आंनदाचे वातावरण पसरले आहे. त्यातच गुरुवारी सकाळी बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी लगेचच पेरण्यांची लगबग सुरु केली. बाजरी, मका, सायोबीन, मूग, उडीद, तूर यांची कसबशी पेरणी झाली. शेतात उगवून आलेले पीक पाण्यावाचून जळून जाईल असे वाटत असताना मंगळवारी रात्रीपासूनच्या पाऊस सुरु झाला.
कृषी विभागाने मार्गदर्शन करावे
दोन दिवस झालेल्या भिजपावसाने शेतकरी सुखावला आहे. पेरणीची कामांनीही वेग घेतला आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक गावातून जाऊन पीक परिस्थिती व करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
परतूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस
या जिल्ह्यात बुधवार अखेरपर्यंत ८८.८३ मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली. बुधवारी ११.८५ मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात परतूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १४२.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर सर्वात कमी पाऊस मंठा तालुक्यात झाला आहे. त्याचे प्रमाण ४७ मिलीमीटर एवढेच आहे..
खरीप पेरण्यांना
वेग येईलच
जिल्ह्यात ५ लाख ६१ हजार एवढे खरिपाचे क्षेत्र आहे. बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात एक लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला. म्हणजे ७१ टक्के पेरण्या खोळंबलेल्या होत्या. त्या पेरण्यांना आता मोठा वेग येईल. जवळपास ७५ टक्के पेरण्या या चार दिवसांत पूर्ण होतील. असा अंदाज जिल्हा कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

Web Title: Start the abandoned sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.