एसटी महामंडळाचा आंधळा कारभार !
By Admin | Updated: December 13, 2014 23:50 IST2014-12-13T23:50:42+5:302014-12-13T23:50:42+5:30
सूर्यकांत बाळापूरे , किल्लारी प्रवाशांच्या सेवेसाठी असे ध्येय उराशी बाळगून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या आंधळ्या कारभारामुळे प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़

एसटी महामंडळाचा आंधळा कारभार !
सूर्यकांत बाळापूरे , किल्लारी
प्रवाशांच्या सेवेसाठी असे ध्येय उराशी बाळगून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या आंधळ्या कारभारामुळे प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़ परिणामी, अवैध वाहतुकीकडे प्रवाशांचा कल असल्याचे पहावयास मिळत आहे़
एसटी प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो़ विशेषत: ग्रामीण भागाच्या विकासासाठी महाराष्ट्र एसटी महामंडळाचे योगदान महत्त्वाचे मानले जाते़ त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा खाजगी वाहतुकीपेक्षा एसटीने प्रवास करण्यावर सर्वाधिक भर असल्याचे पहावयास मिळते़ परंतु, एसटी महामंडळाच्या आंधळ्या कारभारामुळे प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़
गेल्या ६४ वर्षांपासून एसटी महामंडळ कार्यरत आहे़ त्यामुळे प्रवाशांच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत़ त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्नशील असले तरी काही बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे पहावयास मिळत आहे़ गेल्या तीन - चार महिन्यांच्या कालावधीत डिझेलच्या दरात जवळपास ६ ते ७ रुपयांनी कपात झाली आहे़ परंतु, एसटी महामंडळ तिकीटाचे दर करण्यास टाळत आहे़ एखाद्यावेळी डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर हेच कारण पुढे करीत तिकीटाच्या दरात एसटी महामंडळ वाढ करते़ परंतु, डिझेलचे दर कमी झाले असतानाही दरात कपात केली जात नाही़ परिणामी, प्रवाशी एसटी ऐवजी खाजगी वाहतुकीकडे वळत आहेत़
त्याचबरोबर अपंग, महिला, ज्येष्ठ नागरिक, आमदार आदींसाठी बसमध्ये राखीव आसन असतात़ हे राखीव आसन ओळखता यावे म्हणून आसनाच्या वरील बाजूस ठळक अक्षरात लिहिलेले असतेही़ परंतु, या राखीव जागांवर अन्यच मंडळी बसलेले पहावयास मिळतात़ परिणामी, ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंगांना अनेकदा उभारुन प्रवास करावा लागतो़ एखाद्याने तक्रार केल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते़ त्यामुळे जर हे राखीव आसन नसतील तर आसनावर लिहून प्रवाशांची दिशाभूल कशासाठी करायची असा सवाल होत आहे़ अनेकदा बसचालक व वाहक थांब्यावरही बस थांबविण्यास टाळाटाळ करीत असतात़ त्यामुळे अनेकदा विनंती करावी लागते़
या मार्गावरुन धावणाऱ्या बहुतांशी बससेमध्ये कचरा पडलेला असतो़ वास्तविक पहाता, एसटी बसेसची दररोज स्वच्छता करणे आवश्यक आहे़ बसची दररोज स्वच्छता करण्यात यावी म्हणून प्रत्येक नवीन बसला केरसुनीही देण्यात येते़ परंतु, ही कुठे गायब झालेली असते़ हा संशोधनाचा विषय ठरत आहे़ त्यामुळे प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़४
डिझेलचे दर कमी झाल्याने तिकीट दरात कपात करावी, अशी प्रवाशांतून मागणी होत आहे़ परंतु, तिकीट दर कमी करण्याचा निर्णय हा महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे घेते़ त्याचबरोबर बसमधील आसन राखीव ठेवण्यासाठी त्याची नोंद करणे आवश्यक असल्याचे एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक डी़ बी़ माने यांनी सांगितले़